जिल्हा
बारवी ५० टक्क्यांवर; भातसा धरण साठीकडे
बारवी ५० टक्क्यांवर; भातसा धरण साठीकडे
फोटो: ठाणे वैभव
विश्रांतीनंतर पावसाने जोर धरला
ठाणे : सलग सहा दिवस दडी मारून बसलेल्या पावसाने गेल्या दोन-तीन दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा हजेरी लावली आहे. संथ पण सातत्यपूर्ण पावसामुळे ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या भातसा धरणात ५७ टक्के पाणीसाठा झाला असून बारवी धरणाने अखेर ५० टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे.
गेल्या तीन दिवसांत पावसाचे प्रमाण हळूहळू वाढताना दिसत असून, १४ जुलै रोजी जिल्ह्यात अत्यंत नगण्य म्हणजेच केवळ ०.१३ मि.मी. सरासरी पावसाची नोंद झाली होती. १५ जुलै रोजी या प्रमाणात किंचित वाढ होऊन जिल्ह्याची सरासरी १.८८ मि.मी. इतकी नोंदवली गेली. १६ जुलै रोजी मात्र पावसाने थोडा जोर धरला असून, जिल्ह्याची सरासरी १३.५० मि.मी. इतकी नोंदवण्यात आली आहे. १६ जुलैच्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक पाऊस शहापूर येथे ४१.० मि.मी. झाला. तर मुरबाड तालुक्यांत ३५ मि.मी. पाऊस झाला आहे.
पावसाने मध्येच ओढ दिल्याने बारवी धरणाचा पाणीसाठा ५० टक्क्यांच्या उंबरठ्यावर रेंगाळला होता, मात्र नुकत्याच झालेल्या या तुरळक पावसामुळे धरणात पाण्याची आवक सुरूच राहिली आहे. १४ जुलै रोजी बारवी धरणातील उपयुक्त पाणीसाठा १६८.०१ दशलक्ष घन मीटर म्हणजेच ४९.८८ टक्के इतका होता. तो आता १६ जुलैच्या ताज्या अहवालानुसार १७०.३२ दशलक्ष घन मीटरवर पोहोचला असून, पाण्याची टक्केवारी ५०.२७ टक्के इतकी झाली आहे. जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारी इतर धरणेही उत्तम स्थितीत असून १६ जुलै रोजी भातसा धरणात ५७.६१ टक्के, तानसा धरणात ७८.९८ टक्के, तर मोडक सागर धरणात ७७.११ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
पावसाचा जोर अजूनही कमी असल्याने उल्हास नदीसह जिल्ह्यातील सर्व प्रमुख नद्या धोक्याच्या पातळीपेक्षा खूप खाली वाहत आहेत. १६ जुलै रोजी बदलापूर येथे उल्हास नदीची पातळी १३.३० मीटर इतकी नोंदवली गेली असून येथील इशारा पातळी १६.५० मीटर आहे. तसेच, कल्याण (टिटवाळा) येथे काळू नदीची पातळी ९९.०० मीटर असून ती तिच्या १०२.०० मीटर या इशारा पातळीपेक्षा कमी आहे आणि शहापूरमध्ये भातसा नदीची (सापगाव) पातळी ३१.४० मीटर असून ती देखील सुरक्षित आहे.
300x450
300x600