जिल्हा
आंबा महोत्सवात दहा दिवसांत दोन कोटींची उलाढाल
आंबा महोत्सवात दहा दिवसांत दोन कोटींची उलाढाल
फोटो: ठाणे वैभव
आमदार संजय केळकर यांची माहिती
ठाणे: संस्कार संस्था आणि कोकण विकास प्रतिष्ठान आयोजित १९व्या आंबा महोत्सवात दहा दिवसांत तब्बल दोन कोटींची उलाढाल झाल्याची माहिती महोत्सवाचे आयोजक तथा आमदार संजय केळकर यांनी दिली.
ठाण्यातील गावदेवी मैदान येथे १ ते १० मे या कालावधीत आयोजित आंबा महोत्सवाला ठाण्यासह आसपासच्या भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महोत्सवात कोकणातील अस्सल हापूस, पायरी, रत्ना, केसर आंब्याबरोबरच आंबा-फणस पोळी, सरबते, काजू, मालवणी मसाले, लोणचे, पापड, पोहे आदी कोकणातील उत्पादनांचे सुमारे ४५ स्टॉल होते.
महोत्सवाला दररोज शेकडो नागरिक भेट देत खरेदी करत होते. थेट शेतकरी आणि ग्राहक यांची भेट होत असल्याने ग्राहकांना स्वस्त दरात अस्सल आंबा मिळत होता तर शेतकऱ्यांचाही व्यवसाय मोठ्या प्रमाणात झाला. खरेदीदारांसाठी लकी कुपन ड्रॉ आयोजित करण्यात आला होता. विजेत्यांना घरपोच आंबे देण्यात येणार आहेत. महोत्सवात प्राणिक हिलींग शिबिरही आयोजित करण्यात आले होते. त्याचा लाभ शेकडो नागरिकांनी घेतला.
शेवटच्या दिवशी आमदार संजय केळकर यांनी महोत्सवात आंबा शेतकरी आणि स्टॉल धारकांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी झालेल्या विक्रीबाबत समाधान व्यक्त करत श्री केळकर यांचे आभार मानले. यावेळी माध्यमांशी बोलताना श्री.केळकर म्हणाले. प्रतिकुल परिस्थितीत कोकणात आंब्याचे अवघे १५टक्के उत्पादन झाले. हा आंबा घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना महोत्सवात उत्तम प्रतिसाद मिळाला. गेल्या दहा दिवसांत सुमारे ३५ ते ४० हजार डझन आंबा विकला गेला तर तब्बल दोन कोटींची उलाढाल झाली, अशी माहिती श्री.केळकर यांनी दिली.
300x450
300x600