भाईंदर: पश्चिम रेल्वेवरील सर्वात महत्त्वाच्या आणि गर्दीच्या स्थानकांपैकी एक असलेल्या विरार रेल्वे स्थानक पुनर्विकासाला आता वेग आला आहे. केंद्र सरकारच्या ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेअंतर्गत विरार स्थानकाला नवा लूक देण्यात येणार असून, हे स्थानक आता केवळ रेल्वे थांबा न राहता एक ‘सिटी सेंटर’ म्हणून विकसित केले जाणार आहे.
विरार स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी स्थानकावर प्रशस्त ‘रूफ प्लाझा’ बांधला जाईल, जिथे खाण्यापिण्याची दुकाने, वेटिंग लाउंज आणि करमणुकीच्या सुविधा असतील. बस, रिक्षा आणि खाजगी वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका बनवण्यात येतील, ज्यामुळे स्थानक परिसरात होणारी वाहतूक कोंडी फुटण्यास मदत होईल. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी स्थानकाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर अतिरिक्त लिफ्ट आणि एस्केलेटरची सोय केली जाईल. संपूर्ण स्थानक परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली असेल आणि अत्याधुनिक आपत्कालीन यंत्रणा कार्यान्वित केली जाईल. स्थानकाच्या इमारतीवर पालघर जिल्ह्याची ओळख असलेल्या ‘वारली चित्रकलेचा’ आणि स्थानिक संस्कृतीचा प्रभाव पाहायला मिळणार आहे. सध्या विरार स्थानकावर वाढत्या लोकसंख्येमुळे प्रचंड गर्दी होते. पुनर्विकासाच्या या प्रकल्पामुळे प्लॅटफॉर्मवरील गर्दीचे नियोजन करणे सोपे जाईल. तसेच, विरार हे लांब पल्ल्याच्या गाड्यांचे महत्त्वाचे टर्मिनस असल्याने, बाहेरगावच्या प्रवाशांनाही विमानतळासारख्या सोयी-सुविधा येथे मिळणार आहेत.