अवकाळी पावसाने झोडपले; शहापूर-मुरबाडला भिजवले

ठाणे-कल्याणात सोसाट्याचा वारा

ठाणे: ठाणे शहरात आज अचानक अंधार पडून सोसाट्याचा वारा सुटल्याने पादचाऱ्यांची आणि वाहन चालकांची एकच तारांबळ उडाल्याचे चित्र संध्याकाळी पाहण्यास मिळाले. सुदैवाने या वाऱ्यामुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडली नाही. दरम्यान शहापूर आणि मुरबाडमध्ये पावसाने जनजीवन विस्कळीत केले. कल्याणातही सोसाट्याच्या वाऱ्याने धुळीचे साम्राज्य पाहायला मिळाले.

शहापूर आणि मुरबाड तालुक्यात अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यानंतर पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचून चिखल झाला. भाजीपाल्याचे नुकसान झालेच पण आयोजित लग्न समारंभातही मंडपांचे नुकसान झाले. कल्याणमध्ये सोसाट्याच्या वाऱ्याने सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले होते तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या कोसळून पडल्याच्या घटना घडल्या.

ठाणे शहरात गुरुवारी सायंकाळी साडे चारनंतर अचानक सोसाट्याच्या वाऱ्याला सुरवात झाली. या वाऱ्यामुळे सर्वत्र धुळीचे लोण उठले होते. या वाऱ्यामुळे वातावरणात धुळीचे साम्राज्य पसरल्याचे दिसून आले. शहरात गुरुवारी सकाळपासूनच उष्णतेचे वातावरण निर्माण झाले होते. अशातच दुपारी साडे चारच्या सुमारास सुरुवातीला घोडंबदर भागात काहीसा अंधार झाला. काही वेळातच वादळी वाऱ्याला सुरवात झाली. येथील भागात धुळीचे लोण सगळीकडे पसरले होते. सध्या या भागात मेट्रो आणि रस्त्याची कामे सुरु आहेत. त्यात वाऱ्यासह धुळ उडाल्याने वाहनांचा वेगही कमी झाल्याचे दिसून आले.

घोडबंदरकडून हे वारे ठाण्याच्या दिशेने आले. पावणे पाचच्या सुमारास कडक उन्हात ठाणे शहरात अचानक ढगाळ वातावरण निर्माण होऊन काहीसा अंधार पसरला. क्षणात वाऱ्याला सुरवात झाली. दुचाकी वाहन चालक आपल्या गाड्या रस्त्याच्या कडेला लावून आडोशाला उभे राहिल्याचे दिसून आले. १५ मिनिटानंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे झाली आणि वातावरणात उकाडा जाणवू लागला.

या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे कोणत्याही प्रकारची दुर्घटना घडली नाही. मागिल वर्षी अशाच पद्धतीने सोसाट्याचा वारा सुटून होर्डिंगचा पत्रा तुटून पडला होता. अनेक घरांचे पत्रे उडाले होते. यावेळी मात्र अशी कोणतीही घटना ठाण्यात घडली नाही.