जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत-नजीब मुल्ला
ठाणे : एकीकडे पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार हे जवळपास निश्चित झाले असताना ठाण्यातही तशाच हालचाली सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नसून आम्हाला युतीचा प्रस्ताव आला तर आम्ही तो पक्षश्रेष्ठींकडे पाठवू असे वक्तव्य अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष नजीब मुल्ला यांनी केले. तर शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष मनोज प्रधान यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिल्याने ठाणे महापालिका निवडणुकीत दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेला पुष्टी मिळाली आहे.
अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नजीब मुल्ला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड हे कट्टर विरोधक मानले जातात. मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातून नजीब मुल्ला यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात महायुतीतून निवडणूक लढवली होती. आता त्याच ठाण्यात निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत.
जितेंद्र आव्हाड आमचे दुश्मन नाहीत. आमचा त्यांना कधीच व्यक्तिशः विरोध नव्हता, फक्त त्यांच्या कार्यपद्धतीला आमचा विरोध होता. 30 डिसेंबरपर्यंत जर आम्हाला कोणाचा प्रस्ताव आला तर आम्ही तो पक्षश्रेष्ठींकडे पाठवणार आणि विचार करणार. शेवटी कार्यकर्त्यांना निवडून आणायचे आहे, असे राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे नजीब मुल्ला म्हणाले.
ठाणे शहरात जर पक्ष वाढवायचा असेल तर त्यांनी आता विचार करावा, असे सूचक वक्तव्यही नजीब मुल्ला यांनी केले. त्यामुळे ठाण्यातील शरद पवार गट देखील आता एक पाऊल पुढे टाकून अजित पवार गटासोबत युतीचा विचार करणार का? असा प्रश्न विचारला जात आहे.
नजीब मुल्ला यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष मनोज प्रधान यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ते म्हणाले, नजीब मुल्ला यांच्या भावनांचे स्वागत करतो. आमच्या वरिष्ठ नेत्यापर्यंत त्यांच्या भावना पोहचवल्या जातील. श्री मुल्ला आणि मी दीर्घकाळ आव्हाड यांच्याबरोबर काम केले आहे. निवडणुकीत एकत्र येण्याकरिता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्यात चर्चा होणे आवश्यक असल्याचे श्री. प्रधान म्हणाले.