* ‘दृष्टी २०२५’ मध्ये नृत्यांगना सोनिया परचुरेंचा विद्यार्थ्यांना संदेश
* वावीकर आय इन्स्टिट्यूट व ‘ठाणेवैभव’ यांचा संयुक्त उपक्रम
ठाणे : करिअर निवडीच्या निर्णायक वळणावर उभ्या असलेल्या विद्यार्थ्यांना केवळ गुणांची शर्यत नको, तर आयुष्य समृद्ध करणारी दृष्टी हवी आणि ती दृष्टी कलेतून मिळते, असा संदेश नृत्यांगना सोनिया परचुरे यांनी दिला.
वावीकर आय इन्स्टिट्यूट आणि ‘ठाणेवैभव’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘दृष्टी २०२५’ या भव्य करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात ‘ठाणेवैभव’च्या जुईली बल्लाळ यांनी सुप्रसिद्ध नृत्यांगना सोनिया परचुरे यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सोनिया परचुरे यांनी कलेचे आयुष्यातील महत्व विषद केले. करिअर म्हणजे केवळ गुण, पदवी किंवा नोकरी नाही, तर स्वतःला ओळखून आयुष्य समतोल ठेवणं महत्त्वाचं आहे, असं त्या म्हणाल्या.
लहानपणापासून नृत्याशी जुळलेली आपली नाळ सांगताना त्यांनी स्पष्ट केले की, कला माणसाला शिस्त, संवेदनशीलता आणि आत्मविश्वास देते. अभ्यासासोबत कला जोपासणारी मुलं अधिक डोळसपणे विचार करतात. दहावी-बारावीनंतर आपण कलेच्या झाडाला कमी पाणी देतो, पण कला आणि अभ्यास एकत्र सांभाळणं हे हुशार विद्यार्थ्यांना नक्कीच शक्य आहे,” असा सल्ला त्यांनी दिला. बॉलीवूडच्या आकर्षणाविषयी बोलताना त्यांनी सांगितलं की, यशाचा एकच मार्ग नसतो. प्रत्येकाने आपल्या मूल्यांनुसार वाट निवडली पाहिजे. शास्त्रीय नृत्य, नाटक आणि आंतरराष्ट्रीय अनुभव यांच्या माध्यमातून स्वतःचा स्वतंत्र प्रवास घडवता येतो, हे त्यांनी आपल्या अनुभवातून स्पष्ट केलं. परदेशात कोरिओग्राफी करताना भाषेचा अडसर न होता कलेच्या माध्यमातून संवाद साधता आला, याचा उल्लेख करत त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं की कला ही सार्वत्रिक भाषा आहे. ती माणसाला जगाशी जोडते आणि संस्कार घडवते.
हा कार्यक्रम ६ व ७ डिसेंबर रोजी माजिवडा, ठाणे (प.) येथील वावीकर आय इन्स्टिट्यूटच्या ऑडिटोरियममध्ये पार पडला. यावेळी वावीकर आय इन्स्टिट्यूटचे डॉ. चंद्रशेखर वावीकर, डॉ. वैशाली वावीकर, डॉ. गार्गी वावीकर, सरस्वती विद्या प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा मीरा कोर्डे, ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ व व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ उपस्थित होते. या मार्गदर्शन सत्राचा विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.