भाईंदर: मीरा रोड येथील ड्रीमलँड पार्क विजय पार्क सी विंग इमारतीतील रूम नंबर 102 मधील रहिवासी सुट्टीसाठी परगावी गेले असताना त्यांच्या घरातील कपाटाच्या तिजोरीतून सोने व हिऱ्याचे सुमारे ४० लाखांचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार काशिमीरा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. काशिमीरा पोलिसांनी सुमारे ३५ लाखांचे दागिने व पाच लाखांचे वाहन जप्त करून दोघांना अटक केली आहे.
२२ जून २०२५ रोजी एका महिलेने घरातील दागिने चोरीला गेल्याची पोलिसात तक्रार दाखल केली. चोरीची घटना १५ ते २१ जून दरम्यान झाली. एकूण ४२८ ग्रॅमपेक्षा जास्त सोने आणि हिऱ्यांचे दागिने, ज्यांचे मूल्य ४० लाखांपेक्षा जास्त होते, चोरीला गेले. काशिमीरा पोलिसांना प्रकरणाचे गांभीर्य लक्षात आले. तपास सुरू करण्यात आला आणि सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला. अखेर, दोन व्यक्तींना अटक करण्यात आली, ज्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
कैलास पटेल मूळचा राजस्थान व मयूर रल्हाण रा. मीरारोड या दोघांना कांदीवली येथून अटक केली. त्याच्याकडून सुमारे ३५ लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत आणि उर्वरित दागिन्यांचा शोध सुरू आहे. काशिमीरा पोलिसांनी लोकांना मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षिततेबाबत सावधगिरी बाळगण्याचे आणि घरात सीसीटीव्ही आणि अलार्म सिस्टम वापरण्याचे आवाहन केले आहे. जर कोणाला चोरी किंवा संशयास्पद हालचालींची माहिती असेल तर त्वरित पोलिसांशी संपर्क साधा, असेही पोलिसांनी सांगितले.