शनिवारी मनसेचा ट्रॅफिक मार्च

ठाणे: वाहतूक कोंडीचा मनस्ताप ठाणेकरांना सहन करावा लागत असून मनसेने आक्रमक पवित्रा घेऊन वाहतुक कोंडीच्या विरोधात मनसेने सोमवारी वाहतुक विभागाला जाब विचारला. येत्या शनिवारी वाहतुक कोंडीच्या विरोधात ट्राफीक मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली.

ठाण्यातील घोडबंदर मार्ग असेल, भिवंडीकडून येणारा मार्ग असेल, सर्वच रस्ते वाहतुक कोंडीने ग्रासले आहेत. शहरात पार्कींगची व्यवस्था नाही, त्याचा ठाणेकरांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अवजड वाहतुकीला बंदी असतांनाही ठाण्यात ही अवजड वाहतुक सुरु कशी राहते असा सवाल यावेळी उपस्थित केला. त्यामुळे अवजड वाहतुक आणि वाहतुक विभागाचे काय लागेबांधे आहेत, हे जाहीर करावे असे आवाहनही त्यांनी केले.

शहरातील वाहतुक कोंडी, रस्त्यावरील खड्डे यामुळे ठाणेकर त्रस्त झाले आहेत. त्यात ही समस्या असतांना वाहतुक विभागाकडून सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहन चालकांवर दंड आकारला जात आहे. त्यामुळे त्रस्त झालेल्या ठाणेकरांच्या माध्यमातून येत्या शनिवारी ट्राफीक मार्च काढला जाणार असल्याची माहितीही यावेळी मनसेच्या वतीने देण्यात आली. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले जात आहे. ठाण्यातील महापालिका मुख्यालयापासून तीनहात नाक्यापर्यंत हा मोर्चा काढला जाणार आहे. यात समस्त ठाणेकर सहभागी होतील असा विश्वासही मनसे नेते अविनाश जाधव यांनी व्यक्त केला यावेळी शहर अध्यक्ष रविंद्र मोरे, सुशांत सूर्यराव आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.