चाळीमधील सहा घरांच्या भिंती कोसळल्या

१० कुटुंबांना केले स्थलांतरीत

ठाणे : घोडबंदर भागातील किंगकाँगनगर येथे ओमसाई चाळीतील सहा घरांच्या भिंतींचा काही भाग कोसळल्याची घटना आज सकाळी घडली आहे. सुदैवाने, या घटनेत कुणीही जखमी झाले नाही. बाधीत सहा कुटुंबांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दुसरीकडे स्थलांतरित करण्यात आले असून चाळीतील बाकीची घरे देखील रिकामी करण्यात आली आहेत.

पावसाला अद्याप सुरुवात झाली नसताना ठाण्यात चाळीतील घरांची पडझड सुरु झाली आहे. घोडबंदर रोडवरील एका चाळीतील शनिवारी सहा घरांच्या भिंतींचा काही भाग कोसळल्याने खळबळ उडाली. या घरांच्या भिंती एकेरी विटांनी बांधलेल्या होत्या. पडझड झालेल्या घरांचा उर्वरित भाग धोकादायक स्थितीत असल्याने पालिका प्रशासनाने चाळ रिकामी केली. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कासारवडवली पोलिस,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, माजिवाडा-मानपाडा प्रभाग समितीचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान पोहचले. त्यानंतर मदतकार्य करीत घटनास्थळी घरांचा धोकादायक स्थितीत असलेला भाग अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित काढून टाकला. ओमसाई चाळीतील १० घरे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तात्पुरत्या स्वरूपात रिकामी करण्यात आली.