महायुतीच्या झंझावातापुढे विरोधकांचा टिकाव अशक्य

कपिल पाटील यांचा विश्वास

बदलापूर : भाजपा, शिवसेना, मनसे, आरपीआय, रासप आदी पक्षांमुळे महाराष्ट्रात महायुतीची ताकद वाढली असून या झंझावतापुढे कुणाचाही टिकाव लागू शकणार नाही, असा आशावाद भिवंडी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस आशिष दामले यांच्या पुढाकारातून बदलापूर येथे राष्ट्रवादी पदाधिकारी मेळाव्याचे आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी खासदार पाटील बोलत होते.

लोकसभेची निवडणूक यात्रा सुरू झाली तसे अनेकजण या यात्रेत सहभागी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विकासाच्या मुद्द्यावर भाजपला पाठिंबा दिल्याने राज्यात महायुतीची ताकद वाढल्याचे खा. पाटील म्हणाले. बदलापूरमध्ये शिवसेनेने पुढाकार घेऊन प्रचार यंत्रणा प्रभावीपणे राबवली आहे, त्यामुळे या झंझावातापुढे विरोधकांचा टिकाव लागू शकेल असे वाटत नसल्याचे खा. पाटील म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासारखे खंबीर नेतृत्व महायुतीमध्ये सत्तेत आल्याने ताकद वाढली आहे असा दावा आमदार कथोरे यांनी केला. बदलापुरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढली आहे. नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी पूर्ण ताकदीने प्रचार करण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सांगण्यानुसार सर्व पदाधिकारी महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या प्रचारात सहभागी झाल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस आशिष दामले यांनी सांगितले.

राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रभाकर पाटील, राजेंद्र घोरपडे, शरद तेली, संभाजी शिंदे आदी महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.