रिक्षावाल्याच्या ‘नो एंट्री’ने घेतला महिलेचा जीव!

ठाणे: ठाण्याहून मीरारोडकडे जाणारी रिक्षा गायमुख येथे विरुद्ध दिशेने भरधाव जात असताना समोरून उतारावरून येणाऱ्या ट्रकची धडक बसली. या धडकेने दुभाजकावर आदळून रिक्षाने पेट घेतला. या आगीत रिक्षामधील ५० वर्षीय महिलेचा होरपळून मृत्यू झाला तर रिक्षाचालक जखमी झाला. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असली तरी रिक्षाचालकांच्या बेदरकार वृत्तीबाबत संताप पसरला आहे.

मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही तर राजेश कुमार यादव (४५) असे जखमी रिक्षा चालकाचे नाव आहे. तो लोकमान्य नगर येथे राहणार आहे. आज पहाटे ५च्या दरम्यान ही महिला बेंगलोर येथून आलेल्या गाडीने ठाणे रेल्वे स्थानक येथे उतरली होती. ठाणे येथे रिक्षात बसून त्या बोरिवलीच्या दिशेने जात होत्या. रिक्षा चालकाने गायमुख पोलीस चौकी येथे नो एन्ट्रीमध्ये रिक्षा टाकून तो विरुद्ध दिशेने जात असताना बोरिवलीकडून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकची गायमुख पोलीस चौकी येथे रिक्षाला जोरदार धडक बसली. यात रिक्षा दुभाजकावर आदळून रिक्षाने पेट घेतला. रिक्षातून बाहेर पडण्यास वेळ न मिळाल्याने त्यामध्ये महिला प्रवाशाचा होरपळून मृत्यू झाला तर गंभीर जखमी अवस्थेत रिक्षा चालकाला नजीकच्या खासगी रुग्णालयात पोलिसांनी दाखल केले.

या बाबतची माहिती तेथील पोलीस हवालदार प्रदीप भालेराव यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्षाला दिली. अनोळखी महिलेची ओळख पटली नाही. याबाबत कासारवडवली पोलीस ठाण्यात ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रिक्षाचालकांची बेदरकारी वाढली
घोडबंदर मार्गावर रिक्षाचालक सुसाट वाहने चालवत असतात. सिग्नल न देता प्रवासी घेण्यासाठी अचानक रिक्षा थांबवली जाते. त्यामुळे मागील वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेणे, नो एंट्री मधून निर्धास्त गाड्या चालवणे, ओवरटेक करणे असे प्रकार या मार्गावर सर्रास पाहायला मिळतात.अशा रिक्षाचालकांना वेसण घालण्यासाठी वाहतूक पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज आहे.