लाकडी पेट्या व पेंढा व्यावसायिकांचा पसारा वाढला
नवी मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)च्या फळ मार्केटच्या मागील बाजूस पदपथावर लाकडी पेट्या व पेंढा व्यावसायिकांनी आपले बस्तान मांडले आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये लाकडी पेट्या आणि कागदी पिठ्ठ्यांमुळे या ठिकाणी आग लागून २५ गाळे भस्मसात झाले होते. असे असताना देखील या ठिकाणी अशा व्यासायिकांना जागा देऊन पुन्हा एकदा आगीला आमंत्रण दिल्याचे बोलले जात आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी)च्या फळ मार्केटमध्ये सध्या आंबा हंगाम जोरात सुरू असून बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. ग्राहक, व्यापारी, वाहतूकदार तसेच विक्रेते मोठ्या संख्येने ये-जा करत असताना सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब समोर आली आहे. परवान्याच्या आडून अनेक व्यापाऱ्यांकडून लाकडी पेट्या आणि सुक्या गवताचा पेंढा मोठ्या प्रमाणात बाजार आवाराबाहेर सामायिक रस्त्यांच्या पदपथावर साठवला जात असल्याने आग लागण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः उन्हाळ्यात तापमान वाढल्याने या पेंढ्याला आग लागण्याची शक्यता येथील इतिहास पाहता पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडू शकते, अशी भीती व्यक्त होत आहे.
हा सामायिक रस्ता एपीएमसी बाजार समितीच्या अखत्यारीत येत असल्याचे कारण देत मनपा अतिक्रमण विभागाने आपले हात झटकले आहेत तर येथील व्यापाऱ्यांना लाकडी पेट्या व गवत ठेवण्यास एपीएमसी प्रशासनाने परवानगी दिली असून जागेच्या क्षेत्रफळ वापराबाबत स्थापत्य विभाग अधिक माहिती देऊ शकेल, अशी माहिती फळ मार्केटचे उपसचिव राजू कोंडे यांनी दिली.