मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार हेल्पलाईन जारी
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे ठाणे महानगरपालिकेने, नालेसफाईबाबत तक्रारी आणि अभिप्राय नोंदविण्यासाठी ०२२-२५३९९६१७ ही हेल्पलाईन सुरू केली आहे. त्यावर ठाणेकर नालेसफाईबाबतचा प्रतिसाद नोंदवू शकतात, पालिका त्याची तत्काळ दखल घेऊन आवश्यक ती कारवाई करेल, अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी ठाणे शहरातील रस्ते आणि नाले सफाईच्या कामांची पाहणी करण्यासाठी दौरा केला. कॉनवूड जंक्शन येथील चौक सुशोभीकरण व रस्त्याचे काम, पवार नगरमधील रस्त्यांची कामे, टिकुजिनी वाडी ते नीलकंठ रस्ता, घोडबंदर रोडवरील आनंद नगर येथील नाला, कोरम मॉल मागील नाला आणि ज्ञानसाधना महाविद्यालय येथील परबवाडीजवळील नाला, तसेच, महामार्गाखालील गटार व नवीन भुयारी मार्ग यांची पाहणी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केली. या दौऱ्यात, आमदार प्रताप सरनाईक, माजी महापौर नरेश म्हस्के, मिनाक्षी शिंदे, राम रेपाळे, हनुमंत जगदाळे, विकास रेपाळे, महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर सहभागी झाले होते.
वसंत विहार येथील कॉर्नवुड चौक येथील मलनिस्सारण कामाची पाहणी करून कामास विलंब झाल्याबद्दल संबंधित कार्यकारी अभियंत्याना खडेबोल सुनावले. तसेच नागरिकांची गैरसोय होणार नाही यादृष्टीने काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. या कामातील हलगर्जी करणाऱ्या अधिकाऱ्याकडून खुलासा मागवण्याचे आदेश दिले. हा खुलासा समाधानकारक नसेल तर त्या अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करुन तत्काळ कारवाई करावी, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महापालिका आयुक्त श्री. बांगर यांना सांगितले.
टिकूजीनीवाडी ते नीळकंठ टॉवर येथील काँक्रिट रस्त्याची पाहणी करीत असताना रस्त्याचे काम गुणवत्तापूर्वक झाले आहे का याची मशीनच्या साहाय्याने पाहणी करून रस्त्यांच्या कामाबाबत समाधान व्यक्त केले. तसेच येथील सायकल ट्रॅकचीही पाहणी केली. दरम्यान, निळकंठ टॉवर परिसरातील रस्त्याचे काम करणाऱ्या कामगारांकडे हॅण्डगोव्ह्ज, बूट आदी कोणतेही सुरक्षा साहित्य नसल्याचे निदर्शनास आल्यावर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्या कंत्राटदाराला दंड करण्याचे आदेश दिले.
पावसाळ्यापूर्वीची नाले सफाईची कामे वेळेत पूर्ण व्हायला हवी. पावसाळ्यात खड्ड्यांचा त्रास लोकांना होऊ नये, यासाठी महापालिकेने नियोजन केले आहे. पावसाळ्यात ज्या ठिकाणी खड्डे पडणार नाहीत, नाले तुंबणार नाहीत, यासाठी चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात येईल. निष्काळजीपणा आढळेल व नागरिकांना त्रास होईल, अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असेही श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.
ठाणे शहरासाठी राज्य शासनाकडून ६०५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. या अंतर्गत सध्या २८२ रस्त्यांची कामे प्रभागसमितीनिहाय सुरू आहेत. यात २१४ कोटी रुपयांच्या पहिल्या पॅकेजमध्ये १२७ रस्त्यांची कामे सुरू आहेत. तर, ३९१ कोटी रुपयांच्या दुसऱ्या पॅकेजमध्ये १५५ रस्त्यांची कामे सुरू आहेत. त्याशिवाय, महापालिकेच्या निधीतून सुरू असलेली रस्त्यांची कामे, सरकारी योजनांमधून सुरू असलेली रस्त्यांची कामे, इतर प्राधिकरणांमार्फत सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली.