पथनाट्य-वेशभूषेतून सत्ताधाऱ्यांवर टीका
ठाणे: सध्याचे सरकार भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालत असून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राज्यात जन आक्रोश आंदोलन केले. ठाण्यात झालेल्या आंदोलनात पथनाट्य आणि वेशभूषा करून सरकारवर टीका करण्यात आली.
शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली आज ठाणे स्टेशन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ जनआक्रोश आंदोलन करण्यात आले.
लाडक्या बहिणी, शेतकरी हतबल झाले आहेत. रोजगार पळवल्याने तरुण वर्ग बेरोजगार झाला आहे. मंत्र्यांचे डान्स बार सुरू आहेत. शेजारी नोटांनी भरलेल्या बॅगा ठेवून मंत्री सिगारेटचे झुरके मारत आहेत, कृषीमंत्री भर अधिवेशनात रमी खेळण्यात व्यस्त आहेत, एक मंत्री कॅन्टीनमध्ये बॉक्सिंग करत आहेत तर एक पालकमंत्री पदासाठी अघोरी बुवाबाजी करताना दिसत आहे. या एकही मंत्र्याचा राजीनामा सरकारने घेतला नसून त्यांना पाठीशी घालण्याचे काम होत आहे, असा आरोप श्री.विचारे यांनी यावेळी केला.
आंदोलनात संपर्कप्रमुख नरेश मणेरा, दिवा संपर्कप्रमुख रोहिदास मुंडे, जिल्हाप्रमुख केदार दिघे, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, पुष्पलता भानुषाली, नीलिमा शिंदे, कृष्णकांत कोळी, सुनील पाटील, संजय तरे, प्रदीप शिंदे, सचिन पाटील, विजय कदम, ठाणे उपशहर प्रमुख सचिन चव्हाण, वसंत गव्हाळे, राजेंद्र महाडिक, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, मंदार विचारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.