* पाच कोटींचा निधी मंजूर
* पुढील महिन्यात कामाला सुरुवात
ठाणे: ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघातील पाड्यांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पथदिवे नसल्याने असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होऊन गुन्हेगारीच्या घटना अंधारात घडण्याची शक्यता असते. आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्यामुळे या रस्त्यांवर सौर पथदिवे बसवण्यात येणार असून त्यासाठी पाच कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याचे प्रत्यक्ष काम पुढील महिन्यात सुरू होणार आहे.
ओवळा-माजिवडे मतदारसंघातील ठाणे, मीरा-भाईंदर महापालिका हद्दीत जवळपास २७ छोटे-मोठे आदिवासी पाडे आहेत. आदिवासी पाड्यात घरे दूरदूरवर असतात तसेच सर्व आदिवासी पाड्यांवर विजेच्या जोडण्या दिलेल्या नाहीत. घरात वीज आली असली तरी पाड्यांकडे जाणारे रस्ते, आदीवासी पाडे येथे पथदिवे नाहीत. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जवळ असलेले तसेच वन खात्याच्या हद्दीत येणाऱ्या आदिवासी पाड्यांवर दिवे लावण्यासाठी तत्काळ वन विभागाची परवानगी मिळत नाही. अनेक ठिकाणी महावितरणचे विजेचे खांब, वीज तारा टाकण्यासाठी अडचणी येतात. तसेच वन विभागाचा ना हरकत दाखला, परवानगी मिळत नसल्याने आजवर अनेक ठिकाणी पथदिवे लागलेले नाहीत. त्यामुळे सर्व आदिवासी पाड्यांवर आणि रस्त्यांवर सोलर दिवे बसविण्याची मागणी आमदार सरनाईक यांनी राज्य सरकारकडे केली होती.
याकामी राज्य सरकारची मंजुरी मिळाली असून त्यासाठी पाच कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. आदिवासी पाडे, तेथे जाणारे रस्ते याचा सर्वे आधी झाला आहे. आता निविदा प्रक्रिया झाल्यामुळे हे सोलर दिवे लावण्याचे काम पुढील महिन्यात सुरु होईल, असे आमदार सरनाईक यांनी सांगितले.
सौर पथदिवे या प्रणालीमध्ये वापरली जाणारी बॅटरी साधारण १० ते ११ तास पुरेल इतकी उर्जा साठवून ठेवण्यास सक्षम असते. शिवाय यामध्ये दिवे चालू व बंद करण्यासाठी एक स्वयंचलित बटन देखील असते जे सायंकाळ ते पहाट या कालावधीत दिवे वापरण्यासाठी बनविलेले असते तसेच बॅटरीला अतिरिक्त चार्ज होण्यापासून तसेच ती अतिरिक्त ड्रेन होण्यापासून म्हणजे तिची ताकद पूर्णपणे संपण्यापासून रोखते, असेही श्री.सरनाईक यांनी सांगितले.