ठाणे : राज्यात शिवसेना-भाजप युती असल्याने दिव्याच्या विकासासाठी आलेला निधी हा युतीच्या माध्यमातून आलेला असताना याचे श्रेय केवळ शिवसेना घेत असल्याचा आरोप करत स्थानिक भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
कल्याणचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून विविध प्रकारची विकासकामे प्रस्तावित करण्यात आली असून यामध्ये पुरातत्व खिडकाळेश्वर मंदिर सुशोभिकरणाचे भुमिपूजन, आगरी कोळी वारकरी भवन भुमिपूजन, दिवा शहरातील धर्मवीर नगर, दिवा-आगासन रोड दिवा शहरातील नवीन मुख्य जलवाहिनी, दिवा-आगासन मुख्य रस्ता, आरोग्य केंद्र, दातिवली गाव येथे व्यायाम शाळा, खुला रंगमंच, साबे गाव येथील शाळा ,आगासन देसाई खाडी पुल, सामाजिक भवन , दातिवली तलाव सुशोभिकरण, दिवा शीळ रोड, देसाई गाव तलाव या कामांचे भुमिपूजन अशी अनेक कामे करण्यात येणार असून बुधवारी या सर्व कामांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.
या सर्व विकासकांमाचे श्रेय केवळ शिवसेना घेत असल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात आला आहे. राज्यात युती असली तरी, दिव्यात मात्र शिवसेनेकडून युती संदर्भात कोणत्याही प्रकारचा समन्वय साधला जात नसल्याचा आरोप भाजपाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
गेल्या पाच वर्षांपासून दिव्याच्या विकासाठी ८०० कोटींचा निधी आणला असल्याचे आम्ही ऐकत आहोत. मग दिवा एवढा बकाल का? हा निधी गेला कुठे असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे.