सभागृहनेत्यांचा तोडगा; रेंटल रहिवाशांना दिलासा

प्रकल्पबाधितांना कायमस्वरूपी तर धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना भाड्याची घरे

ठाणे: रस्ता रुंदीकरणामध्ये बाधित रहिवाशांना कायमस्वरूपी तर धोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना भाडे करारावर घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे रेंटल इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

ठाणे महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाने किसन नगर १, २, ३, शांतीनगर, राबोडी, माजिवडा, महागिरी कोळीवाडा, मुंब्रा, कौसा आणि वर्तकनगर या भागातील रेंटल इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना घरे खाली करण्याच्या नोटीस बजावल्या होत्या. ७ एप्रिलपर्यंत त्यांना घरे खाली करण्याचे आदेश दिले होते. त्याबाबत या भाडेकरू नागरिकांनी महापालिकेचे सभागृह नेते हणमंत जगदाळे यांच्याकडे कैफियत मांडली होती. त्याची दखल घेऊन श्री. जगदाळे यांच्या दालनात आज बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत रस्ता रुंदीकरण, नाल्याशेजारी तसेच क्लस्टर योजनेत ज्यांना घर मिळणार नाही अशा नागरिकांना कायमस्वरूपी घर देणे, धोकादायक अधिकृत इमारतींमधील नागरिकांसाठी दोन हजार भाडे, जे रहिवासी क्लस्टरमध्ये बाधित असून ज्यांना योजनेत घर मिळणार आहे अशा रहिवाशांना देखिल भाडे भरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

अनधिकृत धोकादायक इमारतींमधील बाधित नागरिकांबाबत महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याबरोबर बैठक घेऊन योग्य तो तोडगा काढण्यात येणार असून ज्या भागातील नागरिक बाधित झाले आहेत. त्या भागातील लोकप्रतिनिधी आणि आयुक्त यांची संयुक्त बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी दिली.

या बैठकीला गटनेते पवन कदम ज्येष्ठ नगरसेवक राम रेपाळे, संजय भोईर, मनोज शिंदे, विकास रेपाळे, दिलिप बारटक्के, योगेश जानकर नम्रता भोसले, महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.