बाजारात मागील तीन वर्षातील निचांकी आवक
नवी मुंबई: गुढी पाडव्यानिमित्त आंबा खरेदीला ग्राहकांचा कल असतो. मात्र आंबा उत्पादनात घट झाल्याने पाडव्याच्या मुहूर्तावर आंब्याची अपेक्षित आवक झाली नाही. सोमवारी एपीएमसी फळ बाजारात कोकणातील हापूसच्या ६३२५ पेट्या तर दक्षिण भारतातील १०,५२० पेट्यांची आवक झाली आहे.
यंदा अवकाळी पावसाचा मोठा फटका आंब्याच्या उत्पादनावर झाला आहे. त्यामुळे आंब्याची आवक घटल्याचे समोर येत आहे. दरवर्षी गुढीपाडव्याला आंब्याची मोठी आवक एपीएमसी मार्केटमध्ये होत असते. मात्र, यंदा आवक कमी झाल्याने आंब्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आंबा खरेदीसाठी ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. दरवर्षी गुढी पाडव्याला ४० हजाराच्यावर हापूस आंब्याच्या पेट्या एपीएमसी मार्केटमध्ये दाखल होतात. मात्र यावर्षी पहिल्यांदाच गुढीपाडव्याला केवळ १६,८४५ हजार आंब्याच्या पेट्यांची आवक झाली असून त्यात कोकणातील फक्त ६३२५ पेट्या आहेत. अवकाळी पावसाचा मोठा फटका आंबा उत्पादनाला बसला असून, यामुळे आंब्याचे दरही गगनाला भिडले आहेत. यंदा तीन हजार ते आठ हजार रुपयांपर्यंत आंब्याच्या पेटीचा दर असून गतवर्षीपेक्षा २० ते २५ टक्क्यांची वाढ दिसून येत आहे. त्यामुळे १० एप्रिलपासून बाजारात आवक वाढणार असल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेल अशा दरात आंबा उपलब्ध होण्यासाठी अजूनही २० ते २५ दिवसांची वाट पहावी लागणार आहे. सध्या बाजारात दाखल होत असलेला आंबा कमी असला तरी त्याला राज्यातून आणि गुजरातमधून अधिक मागणी असल्याने उठाव चांगला आहे. मात्र गुढीपाडवा लागता बाजारात आंब्याची आवक वाढेल, अशी आशा असताना आवक कमी झाली असून यंदा बाजारातील मागील तीन वर्षांतील निचांकी आवक आहे.
गुढी पाडव्याला २०२३ साली ६५ हजार, २०२४ साली ९५ हजार तर २०२५ साली ४०३०० पेट्या दाखल झाल्या होत्या. यंदा मात्र १६,८४५ पेट्या दाखल झाल्या आहेत.