नामनिर्देशनपत्र दाखल करताना तीनपेक्षा जास्त वाहने नकोत

दालनात पाच व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश नाही

ठाणे : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 16 मार्च 2024 रोजी कार्यक्रम घोषित केला असून निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हादंडाधिकारी व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिनगारे यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अन्वये 16 मार्च 2024 ते निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत 6 जून 2024 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळेस वाहनांच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त मोटारगड्या वाहनांचा समावेश नसावा. तसेच उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतेवेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात पाच व्यक्तींपेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक/सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे/वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी व जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. शिनगारे यांनी लागू केले आहेत.