‘स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात मनसे आक्रमक

ठाणे : स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्य नागरिकांचे वीजबिल वाढत असल्याचा दावा करत, नागरिकांवर सक्तीने मीटर बसविण्याचा प्रयत्न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला.

पूर्वीपेक्षा दुप्पट वीजबिले येत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत असून, अनेक ग्राहकांना दोन हजार रुपयांच्या ऐवजी चार हजार रुपयांपर्यंत बिले मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. स्वतःलाही वाढीव वीजबिलाचा अनुभव आल्याचे त्यांनी नमूद केले. स्मार्ट मीटर योजनेचा लाभ सामान्य ग्राहकांना होत नसून वीज वितरण कंपन्या आणि मोठ्या उद्योगसमूहांनाच त्याचा फायदा होत असल्याची टीका जाधव यांनी केली. अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांनाही मोठ्या रकमेची वीजबिले येत असल्याचा दावा करत, वाढत्या महागाईच्या काळात हा अतिरिक्त आर्थिक भार सर्वसामान्यांना परवडणारा नसल्याचे त्यांनी सांगितले. स्मार्ट मीटरविरोधात राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर तक्रारी प्राप्त झाल्याचा दावा करत जाधव म्हणाले, “लाखो नागरिक एखाद्या योजनेला विरोध करत असतील, तर त्यांच्या भावना लक्षात घेऊन शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करणे आवश्यक आहे.” लोकांचा विरोध असतानाही मीटर बसविण्याची सक्ती योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अधिकाऱ्यांनी नागरिकांवर दबाव टाकू नये आणि कोणत्याही ग्राहकाच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसवू नये, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना संबंधित नागरिकांच्या पाठीशी उभी राहील, असेही त्यांनी सांगितले.