वाहतूक कोंडीने कल्याणकर हैराण
कल्याण : कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पत्रीपुल रस्ता दरम्यान 700 मिमि व्यासाची जलवाहिनी मेट्रो च्या कामामुळे फुटल्याने लाखो लीटर पाणी वाया गेल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. यामुळे पाणी पुरवठा वितरण व्यवस्था कोलमडल्याने पाणी बाणी समस्या निर्माण झाली. तर संदर्भीत रस्ता परिसरात दुरुस्ती कामामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाल्याने वाहनाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह वाहन चालकांना विलंबाने समारे जाण्याचा प्रसंग उद्भवला.
कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पत्रीपुलकडे जाणारा मुख्य रस्ता एमएमआरडीएच्या अधीपत्याखाली असून या रस्त्यामध्ये मेट्रोचे काम सुरू असून मंगळवारी दुपारच्या सुमारास कडोंमपाच्या 700 मि.मि व्यासाची मुख्य जलवाहिनी या कामात फुटल्याने ती प्रशासनाने 22 तासांच्या प्रयत्नाने बुधवारी सकाळी 9.30च्या सुमारास दुरुस्त केली आणि पाणी पुरवठा सुरळीत झाला. या कामामध्ये एमएमआरडीए तसेच मेट्रो व्यवस्थापन, कडोंमपा प्रशासन यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने या घटनेमुळे पाणी बाणी समस्यासह वाहतूक कोंडीचा फटका सर्वसामान्यांना बसल्याचा आरोप जाणकारांकडून होत आहे.