आंबा बागांना ढगाळ हवामानाचा फटका

शहापूर तालुक्यात ५७६ हेक्टरवर ७० टक्के नुकसान

शहापूर: शहापूर तालुक्यात सध्या वाढती उष्णता आणि सतत ढगाळ वातावरणामुळे आंबा झाडांवरील फळगळ मोठ्या प्रमाणात सुरू झाली असून आंबा बागायतदार चिंतेत पडले आहेत. फळे पक्व होण्याच्या आधीच झाडांवरून गळत असल्याने यंदाच्या हंगामात मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तालुक्यातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचबरोबर वातावरण ढगाळ राहिल्याने आंबा झाडांच्या वाढीवर व फळ धारणेवर प्रतिकूल परिणाम होत आहे. परिणामी झाडांवरील लहान व मध्यम आकाराची फळे मोठ्या प्रमाणात खाली पडत असल्याचे आंबा बागायतदार सांगत आहेत.

शहापूर तालुक्यात उत्पादनक्षम आंबा पिकाचे क्षेत्र 576 हेक्टर क्षेत्रावर आहे. अनेक शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून आंबा बागांची निगा राखली, मात्र हवामानातील अचानक बदलामुळे त्यांच्या अपेक्षांवर पाणी फिरत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः ग्रामीण व डोंगराळ भागातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना याचा अधिक फटका बसत आहे. फळगळ सुरू राहिल्यास उत्पादनात मोठी घट होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त बागायतदारांना मदत द्यावी तसेच तज्ञांच्या मार्गदर्शनातून फळगळ कमी करण्यासाठी उपाययोजना सुचवाव्यात अशी मागणी आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

कृषी शास्त्रज्ञ तसेच कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांच्या माध्यमातून संयुक्त पाहणी केली आहे. त्यानुसार शासनाला अहवाल पाठवला असून शासन स्तरावरून कार्यवाही सुरु असल्याचे समजते. तथापि 70 टक्के नुकसान झाले असल्याचे शासनाला कळविले आहे, असे जिल्हा कृषी अधिकारी रामेश्वर पाचे यांनी सांगितले.

यावर्षी आंब्याला चांगला मोहोर आला होता, त्यामुळे उत्पादन चांगले मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान आणि वाढती उष्णता यामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ होत आहे. झाडावर लागलेली लहान-मोठी फळे गळून पडत असल्याने बागायतदारांचे मोठे नुकसान होत आहे. शासनाने याची दखल घेऊन पंचनामा करून मदत द्यावी, अशी मागणी स्थानिक आंबा बागायतदार बबन हरणे यांनी केली आहे.