१४० हून अधिक तरुणींना फसवणारा ‘मजनू’ अटकेत

कल्याण: सोशल मीडियावर मैत्री आणि प्रेमाचे आमिष दाखवून तरुणींना लाखोंची फसवणूक करणाऱ्या आदर्श म्हात्रे या भामट्याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. तपासात आरोपीने १४० हून अधिक तरुणींना जाळ्यात ओढल्याचे समोर आल्याने पोलीसही हादरले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरून तरुणींशी ओळख वाढवत होता. त्यानंतर प्रेमाचे नाटक करून त्यांचा विश्वास संपादन करत असे. काही दिवसांनी त्यांच्या नावावर बँकांकडून लाखो रुपयांचे कर्ज काढून आरोपी फरार होत होता.

या प्रकरणात आतापर्यंत ११ तरुणींनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे फसवणुकीला बळी पडलेल्या बहुतांश तरुणी उच्चशिक्षित असून कॉर्पोरेट, बँकिंग आणि इतर व्यावसायिक क्षेत्रात उच्च पदांवर कार्यरत आहेत.

डोंबिवलीतील एका तरुणीच्या तक्रारीनंतर या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. आरोपी आदर्श म्हात्रे हा पनवेल येथील रहिवासी असून नवी मुंबई पोलिसांनी यापूर्वीही अशाच प्रकारच्या गुन्ह्यात त्याला अटक केली होती. तक्रार मिळाल्यानंतर मानपाडा पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. सध्या पोलिसांकडून त्याचे मोबाईल, सोशल मीडिया अकाउंट आणि बँक व्यवहारांची तपासणी सुरू आहे.

पोलिसांना संशय आहे की आरोपीने केवळ डोंबिवली आणि नवी मुंबईच नव्हे, तर राज्यातील इतर शहरांतील महिलांनाही गंडा घातला आहे. या फसवणुकीची रक्कम कोट्यवधी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, पुढील तपासात आणखी पीडित तरुणी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.