मुंबईसारखे ठाणे सुद्धा मेट्रो सिटी

ठाण्यात जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना अभिनेते जितेंद्र यांचे कौतुकोद्गार

मुंबईसारखे ठाणे शहरही मेट्रो सिटी वाटत आहे. १५ वर्षांपूर्वी ठाण्यात आलो होतो. तेव्हाचे आणि आताचे ठाणे यात मोठा फरक आहे. या शहराचा झपाट्याने विकास झाल्याने येथे गुंतवणूक करण्यासाठी सारेच पसंती देत आहेत, आहे गौरवोद्गार प्रसिद्ध अभिनेते जितेंद्र यांनी ठाण्यात एक कार्यक्रमात काढले.

ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठान आयोजित सूर आणि ताल यांचा अनोखा आनंदोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त हा सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो. कलाक्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्वांना सोहळ्यात पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यंदाचा धर्मवीर आनंद दिघे जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते जितेंद्र यांना राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार अंबरीश मिश्रा यांनी घेतलेल्या मुलाखतीत त्यांनी ठाणे शहराचे कौतुक केले.

“ठाणे हे गेल्या काही वर्षात खूप प्रगतीशील शहर झाले आहे. मी जेव्हा १५ वर्षांपूर्वी ठाण्यात आलो होतो तेव्हा ४५ मिनिटात यायचो, आता दीड तास लागतो. कारण आधी जंगल होते. पण आता याठिकाणी ठाण्याचा विकास झपाट्याने झाला आहे. मला हा पुरस्कार दिला, त्याबद्दल मी आभार व्यक्त करतो,” असे जितेंद्र म्हणाले.

यावेळी बोलताना श्री.आबिटकर म्हणाले, आम्हाला ९ फेब्रुवारीला त्याचा शुभारंभ करायचा होता. परंतु यामध्ये काही प्रशासकीय मान्यता बाकी होती. प्रशासकीय मान्यता काही दिवसात पूर्ण होईल. तीन ते चार महिन्यात पूर्तता करून याचा निर्णय घेऊ. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधायचे होते, पण हरकत नाही. महाराष्ट्रातील सर्वात मोठे ९०० बेडचे हे आरोग्य विभागाचे एकमेव रुग्णालय आहे. तांत्रिक बाबी लक्षात घेऊन येत्या तीन ते चार महिन्यात सिव्हिल रुग्णलयाचे लोकार्पण एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.