कुळगाव-बदलापूरच्या विकासासाठी नगरोत्थान योजनेतून ₹२५ कोटी

बदलापूर: कुळगाव-बदलापूर शहरातील विविध विकासकामांसाठी राज्य सरकारच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून शहरात २५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत.

केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडून या कामांच्या मंजुरीसाठी पाठपुरावा करण्यात आला होता. या कामांचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. वाहनांसाठी पार्किंग प्लाझा, स्टेडियम, जॉगिंग ट्रॅक व स्केटींग ट्रॅक, शहरातील विविध ठिकाणी कॉंक्रीट रस्ते, तलाव व उद्यानांचे सुशोभिकरण आदी कामांचा त्यात समावेश आहे.
कुळगाव-बदलापूर परिसरातील वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून विविध कामे सुरू आहेत. केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून पाणीपुरवठ्याचे काम सुरू आहे. तर राज्य सरकारच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून शहरातील १५ कामांसाठी निधी देण्याची विनंती केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यानुसार सुमारे २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

आदर्श विद्या मंदिराच्या सभागृहात भाजपा कार्यकर्ते व नागरिकांची छोटी सभा घेऊन मार्गदर्शन केले. या वेळी व्यासपीठावर भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष रामभाऊ पातकर, माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे, भाजपाचे पूर्व विभागाचे शहराध्यक्ष संजय भोईर, माजी नगरसेवक संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर घोरपडे, रमेश सोळसे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश गोडसे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचा संकल्प केला आहे. त्यानुसार शहरांबरोबरच गावेही घडविली जात आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या दृष्टीकोनातून बदलापूरात सुविधा पुरविण्यासाठी नगरोत्थान योजनेतून कामे सुरू करण्यात आली आहेत. येत्या काही महिन्यांत सर्व कामे पूर्ण होऊन नागरिकांना सुविधा मिळतील, अशी ग्वाही कपिल पाटील यांनी दिली. या वेळी खासदार निधीतून आदर्श विद्या मंदिराकडे विद्यार्थ्याच्या डिजिटल शिक्षणासाठी ५ प्रोजेक्टर सोपविण्यात आले.