मुंबई: मुंबई-लातूर प्रवास अतिजलद करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) कल्याण-लातूर जनकल्याण द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या महामार्गास राज्य सरकारने हिरवा कंदिल दाखविल्यानंतर एमएसआरडीसीने संरेखनाच्या कामाला सुरुवात केली आहे.
एमएसआरडीसीच्या चार हजार किमी लांबीच्या रस्ते प्रकल्पात कल्याण-लातूर द्रुतगती महामार्ग प्रस्तावित करण्यात आला होता. मात्र अनेक वर्षे हा महामार्ग कागदावरच होता. नागपूर हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महामार्गासंबंधीचे एक सादरीकरण पाहिल्यानंतर हा महामार्ग तातडीने मार्गी लावण्याची सूचना करून प्रकल्पाला तत्वत: मान्यता दिली. त्यानंतर त्यांनी विधानसभेत या महामार्गाची घोषणा करून त्याच्या अंमलबजावणीचा मार्ग मोकळा केला. या महामार्गाला जनकल्याण महामार्ग असे नाव देण्यात आले आहे.
मराठवाड्याचा, त्यातही लातूरचा विकास साधणारा हा महामार्ग असल्याने याला जनकल्याण नाव दिल्याचे एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले. दरम्यान, राज्य सरकारच्या मान्यतेनंतर एमएसआरडीसीने सल्लागाराच्या माध्यमातून या महामार्गाच्या संरेखनाच्या कामाला सुरुवात केली. संरेखन पूर्ण होण्यास आणखी काही दिवस लागणार आहेत. मात्र हा महामार्ग सहा जिल्ह्यांतून जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.
कल्याण, माळशेज घाट, अहिल्यानगर, बीड, मांजरसूंबा आणि अंबेजोगाईवरून लातूर आणि पुढे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागात हा महामार्ग जाणार असल्याचे ढोबळमानाने सांगितले जात होते. पण आता मात्र हा महामार्ग नेमका कसा जाणार आहे याची माहिती सूत्रांनी दिली. त्यानुसार उल्हासनगर, मुरबाड, जुन्नर, अहिल्यानगर, आष्टी, पाटोदा, बीड, केज, कळंब,लातूर, औसा आणि निलंगा असा हा महामार्ग जाणार आहे. या संरेखनानुसार हा महामार्ग ठाणे, पुणे, अहिल्यानगर, बीड, धाराशीव आणि लातूर या सहा जिल्ह्यांतून जाणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मात्र संरेखन अंतिम झाल्यानंतरच याबाबतची स्पष्टता येणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.