ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. आव्हाडांसोबतच ठाण्यातील राष्ट्रीवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले आहेत.
शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. एवढंच नाहीतर शेवटपर्यंत शरद पवार हेच अध्यक्ष राहावेत यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांनी आपला राजीनामा राज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपवला आहे.
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. सर्वांनी आपले राजीनामे राज्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाठवले आहेत. जितेंद्र आव्हाड बोलताना म्हणाले की, “शेवटपर्यंत शरद पवार हेच अध्यक्ष राहावे यासाठी मी प्रयत्न करणार आहे. नवीन कोणी अध्यक्ष झाला असेल तर त्या संदर्भात मला माहिती नाही. एकदा शरद पवार पदावरून बाजूला झाले की, मग ते लक्ष देणार नाहीत. त्यामुळे आम्ही सर्वांनी राजीनामा दिला आहे.”
मंगळवारी (2 मे) अजित पवार यांनी पक्षातील कोणाचाही राजीनामा स्वीकारणार नसल्याचं सांगितलं होतं, असं असतानाही जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक नेत्यांनी पक्षाचे राजीनामे दिले आहेत. राष्ट्रवादीचे प्रतोद अनिल देसाई यांनीही आमदारकीचा राजीनामा दिला आहे. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचं बोलले जात होते. मात्र जयंत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना राजीनामा दिला नसल्याचे सांगितलं. तसेच, अनेक पदाधिकाऱ्यांचे राजीनामे त्यांच्याकडे येत असल्याची माहितीही जयंत पाटील यांनी दिली.