सहा दशकांपासून वृद्ध दाम्पत्य
एक एकरावर घेतात भातपीक
नवी मुंबई: नवी मुंबईसारख्या आधुनिक शहरात झगडे कुटुंबाने आजही आपली शेती संस्कृती जपली आहे. रबाळे गावातील विनायक झगडे आणि त्यांच्या पत्नी विनंदा या वृद्ध दाम्पत्याने सहा दशकांहून अधिक काळ न चुकता भातशेती करून नवी मुंबईकरांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
नवी मुंबई शहर वसण्याआधी तेथे शेत शिवारांनी भरलेली गावे या ठिकाणी होती. मात्र आता या ठिकाणी टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. हे शहर येथील शेतकऱ्यांच्या जमिनीवर उभे राहिले आहे. १९६० साली औद्योगिक वसाहतीकरिता प्रथमत एमआयडीसीमार्फत येथील भूमिपुत्रांची जमीन संपादित करण्यात आली. १९७० साली नवीन शहर वसवण्याच्या नावाखाली शासनाने सिडकोच्या माध्यमातून जमीन संपादित करण्यात आली. येथील आगरी, कोळी, आदिवासी भूमिपुत्र हे आपल्या शेतात भातपीक घेत असत. मात्र संपूर्ण शेती गेल्याने आता फक्त शेतीच्या आठवणी राहिल्या आहेत. रबाळे येथील झगडे कुटुंबांमुळे या आठवणी पुन्हा ताज्या होताना दिसत आहेत. विनायक झगडे (७२) आणि विनंदा झगडे (६२) राहणार रबाळे गाव यांनी रबाळे एमआयडीसीतील डोंगराच्या कुशीत असलेली एक एकर शेतजमीन राखली असून ६० वर्षांहून अधिक काळ दरवर्षी न चुकता जमीन कसत आहेत. वाढते वय पाहता त्यांची मुले त्यांना शेती न करण्याचा आग्रह करतात. मात्र अंगात शेतकरी बाणा असलेले आणि शेतीवर जीवापाड प्रेम करणारे विनायक झगडे थांबण्यास तयार नसून आजही तितक्याच प्रेमाने आणि जिद्दीने पत्नीच्या मदतीने शेती करत आहेत.