आव्हाड यांनी जाहीर सभेत सहर शेख यांची उडवली खिल्ली
ठाणे : ‘कैसा हराया’ असं म्हणत संपूर्ण सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या एमआयएमच्या तरुण नगरसेविका सहर शेख यांच्या या विधानावर अखेर जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्र्याच्या जाहीर सभेत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
एखाद्या मुलीने काही म्हटले तर तिच्याकडे रागाने बघू नका. ती आपलीच मुलगी आहे. उमेदवारी ४० जणांनी मागितली पण मी चौघांनाच उमेदवारी देऊ शकतो ना? जे झाले ते झाले. पण, जग प्रेमानेच जिंकता येते, यावर मी ठाम आहे. मार्जियाही मुंब्र्यात चांगलं काम करत आहे. ती जरी हसत म्हटली असती ‘चॉकलेट लाया’ तेही गाजलं असतं, असं म्हणत आव्हाड यांनी सहर शेख यांच्या विधानाला फारसे महत्व दिले नसल्याचे पाहायला मिळाले.
नुकत्याच झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंब्र्यातून जितेंद्र आव्हाड यांच्याकडून सहर शेख यांचे तिकीट कापल्याने त्यांनी एमआयएममधून निवडणूक लढवून विजय मिळवला. त्यानंतर सहर शेख यांच्या वडिलांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. तर सहर शेख शेख यांनी कैसा हराया असं म्हणत आव्हाड यांना डिवचले होते. तिच्या या वक्तव्याने सोशल मीडियावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. मात्र यावर जितेंद्र आव्हाड यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. अखेर मंगळवारी मुंब्र्यात झालेल्या जाहीर सभेत त्यांनी सहर शेख हिच्या या विधानावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
कौसा भागातून राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे दहा नगरसेवक निवडून आले आहेत. या दहा नगरसेवकांनी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. डाॅ.जितेंद्र आव्हाड हे मुंब्रा शहरात प्रवेश करताच मुंब्रा स्टेशन, संजय नगर, तन्वर नगर, शिमला पार्क आदी ठिकाणी त्यांचे ढोलताशाच्या गजरात तसेच पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. या प्रसंगी माजी विरोधीपक्ष नेते तथा गटनेते शानू पठाण, मुंब्रा-कळवा विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष शमीम खान यांच्यासह सर्व नवनिर्वाचित नगरसेवक उपस्थित होते.
मुंब्र्यातून महात्मा गांधींनी प्रवास केला आहे. ज्या मुंब्र्याला गांधीजींचे पाय लागले आहेत, तिथे लढाईची गोष्ट करणे योग्य नाही. जर घाबरत असतो तर लढलोच नसतो. माझी लढाई ही विचारधारेची असल्याचे आव्हाड यांनी सांगितले. जे मला मारण्याची, मुंब्र्यात येऊ देणार नाही, अशी धमकी देत आहेत, त्यांचा दरवाजा ठोठावला तर धमकी देणाऱ्याचे वडीलच मला आदर सन्मान देतील. कोणी म्हटलं, मुंब्र्यात येऊन दाखव. मी काय घाबरणार आहे का? मी मुंब्र्यात आलो. मला वाघाने आव्हान दिले ना, तरी मी जंगलात जाईन. मला आव्हान देणार्यांना सांगू इच्छितो की, उगाच माझ्या मनात जे आहे, ते मनातच राहू द्या. कारण, जर मी बोललो ना तर अनेकांची झोप उडेल. अनेकांना तुरूंगात जावे लागेल, असा इशारा देखील आव्हाड यांनी सहर शेख यांच्या वडिलांना यावेळी दिला.