नदी पात्रात गाळ आल्याने पाणी पुरवठ्यावर परिणाम

ठाणे: भातसा धरण क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महापालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन येथील नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा व झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसापासून पूर्ण क्षमतेने पंपिंग करण्यात अडचणी येत आहेत.

पाण्यातील अतिरिक्त गढूळपणामुळे शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवरही परिणाम होत आहे. या सगळ्यामुळे ठाणे महापालिका क्षेत्राकडे कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे मंगळवार, ३० सप्टेंबरपर्यंत नागरिकांना अपुऱ्या प्रमाणात व अनियमित पाणीपुरवठा होणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

पिसे येथील पंपाच्या स्टेनरमधील गाळ, कचरा व झाडांच्या फांद्या काढण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. नागरिकांनी कृपया या काळात पाण्याचा वापर जपून करावा आणि महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.