डोंबिवली : उघड्या नाल्याच्या चेंबरमध्ये पडून 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी 28 तारखेला रात्री आठ वाजण्याच्या सुमारास डोंबिवली पश्चिमेकडील गोपीनाथ चौकातील जगदंबा मदिराजवळ घडली.
एमएमआरडीकडून या ठिकाणी रिंगरूटचे काम सुरु आहे. नाल्यावर झाकण टाकण्याची जबाबदारी त्यांची होती, जर झाकण असते तर माझ्या मुलाचा यात पडून जीव गेला नसता, असे मुलाचे वडील एकनाथ कदम यांनी सांगितले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कल्याण जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांनी सरकारने कदम कुटुंबियांना 25 लाखाची आर्थिक मदत करावी अशी मागणी केली आहे.
आयुष कदम असे मृत पावलेल्या मुलाचे नाव आहे. नवरात्री उत्सवानिमित्त भंडारा ठेवण्यात आला होता. यावेळी आयुष या ठिकाणी गेला होता. खूप वेळ होऊन गेला तरी आयुष घरी आला नाही म्हणून कुटुंबियांनी त्याचा शोध सुरु केला. ज्या ठिकाणी भंडारा ठेवण्यात आला होता तेथे समोरच एमएमआरडीएकडून रिंगरूटचे काम सूरू होते. कामाच्या ठिकाणी नाल्याच्या चेंबरवर झाकण लावले नसल्याने याच उघड्या चेंबरमध्ये आयुष पडला.
याची माहिती मिळताच विष्णूनगर पोलीस ठाण्यातील पोलीस व अग्निशमन दलातील जवान आले. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांकडे चेंबरमध्ये उतरण्यास आवश्यक साहित्य नसल्याचे नागरिकांनी सांगितले.