आमदार संजय केळकर यांच्या हस्ते चाव्यावाटप
ठाणे: बाळकुम येथील ३५ इमारतींमधील कुटुंबांना प्रॉपर्टी कार्ड मिळवून दिल्यानंतर येथील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास देखील आमदार संजय केळकर यांच्या प्रयत्नाने मार्गी लागला आहे. यातील दोन इमारतींचा पुनर्विकास पूर्ण झाल्यानंतर प्रजासत्ताक दिनी ११० कुटुंबांना श्री.केळकर यांच्या हस्ते चाव्यावाटप करण्यात आले. त्यामुळे रहिवाशांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.
बाळकुम येथे ३५ इमारती असून धोकादायक झाल्याने इमारतींना महापालिकेकडून नोटीसा प्राप्त झाल्या होत्या. मात्र या इमारतींखालील जमीन विकासकाच्या नावे असल्याने पुनर्विकासाला बाधा निर्माण झाली होती. त्यामुळे रहिवाशांच्या तोंडचे पाणी पळाले होते. भाजपचे मंडल अध्यक्ष निलेश पाटील यांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे रहिवाशांसह धाव घेऊन व्यथा मांडल्यानंतर श्री.केळकर यांनी महापालिका आणि संबंधित विभागाकडे पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन येथील जमिनीचा सातबारा उतारा तयार झाला. विशेष म्हणजे येथील प्रत्येक कुटुंबाचे नाव त्यावर येऊन प्रत्येक कुटुंबाला प्रॉपर्टी कार्डही मिळाले. दरम्यान या इमारतींचा समावेश क्लस्टर योजनेत झाल्याने पुनर्विकास पुन्हा रखडला. मात्र श्री.केळकर यांनी अधिकृत इमारतींना क्लस्टर योजनेतून वगळण्याचा आग्रह धरला आणि त्याबाबत विविध स्तरावर पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना देखील यश येऊन यशस्वी नगर क्लस्टर योजनेतून वगळण्यात आले.
यशस्वीनगरच्या पुनर्विकासातील अडथळे दूर झाल्यानंतर यातील अशोक वाटिका इमारतीच्या दोन विंग आणि भरत कुटीर अशा तीन इमारतींचा पुनर्विकास सुरू झाला आणि १८ महिन्यांनी हे काम पूर्ण होऊन येथील ११० कुटुंबांना घरांच्या चाव्या श्री.केळकर यांच्या हस्ते देण्यात आल्या. यावेळी नीलेश पाटील, संजय पाटील आदी उपस्थित होते. या रहिवाशांना देण्यात आलेली घरे दर्जेदार असून, जॉगिंग, गार्डन, जिम, पार्किंग, क्लब हाऊस अशा आधुनिक सुविधाही देण्यात आल्या आहेत. लवकरच लव कुटीर आणि शत्रुघ्न कुटीर या इमारतींचा पुनर्विकासही मार्गी लागून १२४ कुटुंबांना नियोजित वेळेत त्यांचे हक्काचे दर्जेदार घर मिळणार असल्याचे श्री.केळकर यांनी सांगितले.