हरिकेन हरमन पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियावर धडकण्यास सज्ज

आगामी आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेली तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खूपच चुरशीची ठरली. पाहुण्या ऑस्ट्रेलियन संघाने मालिका 2-1 ने जिंकली असली, तरी निर्णायक सामन्यात भारताच्या जिगरबाज कामगिरीने सर्वांचे मन जिंकले. तब्बल 412 धावांचा डोंगर ऑस्ट्रेलियाने रचला आणि या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ फक्त काही पावलंच दूर राहिला. स्मृती मानधनाचे देखणे फटके, दीप्ती शर्माचे अफलातून स्वीप शॉट्स, कर्णधार कौरचे निर्धास्त नेतृत्व आणि स्नेह राणाचे धाडसी प्रतिकार, या साऱ्यांनी मिळून अशक्य वाटणारा विजय जवळपास शक्य करून दाखवला. जवळपास 800 धावा झालेल्या या सामन्याने महिला क्रिकेटला एक नवी ओळख दिली.

भारत आणि ऑस्ट्रेलियामधील स्पर्धा ही केवळ मैदानापुरती मर्यादित नाही, तर तिचे पाय आयसीसी महिला विश्वचषकाच्या इतिहासात खोलवर रुजलेली आहेत. 2005मध्ये अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता, पण 2017च्या उपांत्य फेरीत हरमनप्रीत कौरच्या अविस्मरणीय 171 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर भारताने बदला घेतला. त्या खेळीने केवळ सामना जिंकला नाही, तर भारतीय महिला क्रिकेटचा संपूर्ण चेहरा मोहराच बदलून टाकला.

मैदानाबाहेरही ही स्पर्धा तितकीच तिखट आहे. 2024 टी-20 विश्वचषकातील उपांत्य फेरीत, हरमनप्रीत आणि हिली यांच्यातील वाद, आणि त्या धक्कादायक धावबादच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. जरी आता तो अध्याय जुना झाला असला तरी प्रत्येक भारत-ऑस्ट्रेलिया सामना म्हणजे काहीतरी खास होणार हे नक्की.

या विश्वचषकातील दोन्ही संघांची सध्याची अवस्था पाहता, एक गोष्ट स्पष्ट दिसते — टॉप ऑर्डर फारशी चाललेली नाही. फलंदाजीची जबाबदारी मधल्या आणि खालच्या फळीतल्या खेळाडूंवर आली आहे.

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या पराभवानंतर भारतासाठी हा सामना अधिक महत्त्वाचा आहे. मोठ्या सामन्यांमध्ये मोठ्या खेळाडूंच्या मोठ्या कामगिरीची अपेक्षा असते. आता वेळ आहे की कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मानधना यांनी जबाबदारी घेऊन भारतासाठी आणखी एक ऐतिहासिक क्षण लिहावा आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या गाजलेल्या स्पर्धेत एक नवी उजळण द्यावी!

आमने-सामने (BOX MADHE)

एकूण: भारत – 11, ऑस्ट्रेलिया – 48
विश्वचषकात: भारत – 3, ऑस्ट्रेलिया – 10
भारतात: भारत – 5, ऑस्ट्रेलिया – 22
आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत: भारत – 3, ऑस्ट्रेलिया – 1

 

संघ

भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उप-कर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, ऋचा घोष (यष्टीरक्षक), उमा छेत्री (यष्टीरक्षक), रेणुका सिंह ठाकूर, दीप्ती शर्मा, स्नेह राणा, श्री चरनी, राधा यादव, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड

ऑस्ट्रेलिया: अ‍ॅलिसा हिली (कर्णधार), डार्सी ब्राउन, ऍश्ले गार्डनर, किम गार्थ, हेदर ग्रॅहम, अ‍ॅलाना किंग, फिबी लिचफिल्ड, ताहलिया मॅक्ग्रा, सोफी मोलिन्यु, बेथ मुनी, एलिस पेरी, मेगन शुट, अ‍ॅनाबेल सदरलँड, जॉर्जिया व्हॉल, जॉर्जिया वेअरहॅम

कोणत्या खेळाडूंवर लक्ष असेल

ऋचा घोष (भारत) – ही यष्टीरक्षक-फलंदाज सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. तिने तीन सामन्यांमध्ये 131 धावा करून फलंदाजीच्या यादीत आघाडी घेतली आहे.

क्रांती गौड (भारत) – आपल्या नावाला साजेसं प्रदर्शन करत, क्रांतीने या विश्वचषकात भारतासाठी एक क्रांतीच घडवली आहे. तिने तीन सामन्यांमध्ये सहा बळी घेतले आहेत. निर्णायक क्षणी विकेट घेण्याची तिची क्षमता ऑस्ट्रेलियाच्या मजबूत फलंदाजीविरुद्ध महत्त्वाची ठरेल.

बेथ मुनी (ऑस्ट्रेलिया) – या डावखुऱ्या फलंदाजाने मागील सामन्यात पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावले.

एलिस पेरी (ऑस्ट्रेलिया) – ही अष्टपैलू खेळाडू भारताविरुद्ध खेळताना नेहमीच चमकदार कामगिरी करते.

 

सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: 12 ऑक्टोबर 2025
वेळ: दुपारी 3 वाजता
ठिकाण: डॉ. वाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम, विशाखापट्टणम्
थेट प्रसारण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क , जिओहॉटस्टार