गायमुखला पुन्हा दुरुस्तीचा ‘घाट’

ठाणे: वाहतुकीसाठी अतिशय महत्वाच्या असलेल्या गायमुख घाटाच्या दुरुस्तीचा पुन्हा एकदा घाट घालण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच मीरा-भाईंदर महापालिकेच्या वतीने घाटाच्या दुरुस्तीसाठी साधारणपणे दोन कोटींचा खर्च केला आहे. आता ठाणे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने गायमुख घाटाची पुन्हा दुरुस्ती करण्यात येणार असून यासाठी आणखी दोन कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. वारंवार होणाऱ्या या दुरुस्तीमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आधीच वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या घोडबंदर वासियांना आता येत्या काही दिवसांत पुन्हा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. ठाणे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने गायमुख घाटाचे पुन्हा दुरुस्तीचे काम काढले आहे. दोन आठवड्यापूर्वीच मीरा-भाईंदर महापालिकेकडून या घाटाच्या दुरुस्तीचे काम करण्यात आले होते. मात्र या कामाला दोन आठवडे देखील उलटत नाही तोच आता ठाणे महापालिका आणि सार्वजनिक बांधकाम पुन्हा दुरुस्तीचे काम हाती घेतले असून नोव्हेंबर महिन्यात हे काम सुरु होण्याची शक्यता आहे.