८० टक्के काम पूर्ण
ठाणे: नवी मुंबईला कल्याण-डोंबिवलीशी जोडणारा ऐरोली-काटई मार्ग झपाट्याने पूर्णत्वास येत असून येत्या दिवाळीपर्यंत तो वाहतुकीला खुला होईल, असे बोलले जात आहे.
ठाणे-बेलापूर मार्गावरील भारत बिजली आणि सिमेन्स या कंपन्यांच्या जवळून ऐरोली येथे सुरू होणारा हा नियोजित रस्ता डोंबिवलीजवळील काटईपर्यंत जाणार आहे. या मार्गावरील दोन्हीकडील पुल जवळजवळ बांधून तयार झाले आहेत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या मार्गावरील १.७ किमी लांबीचा बोगदा तयार झाला आहे. यामुळे ठाणे-बेलापूर रस्त्यावर कल्याणहून येणारी वाहने आणि ऐरोलीहून कल्याणला जाणारी वाहने विना व्यत्यय मार्गक्रमण करू शकतील.
आठ पदरी या बोगद्यातील रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे काम जवळ जवळ संपत आले आहे आणि बोगद्यातील विद्युत विषयक कामे सुरू आहेत.
हा रस्ता अवजड वाहनांना तसेच दररोज दळणवळण करणाऱ्या वाहनांना उपयुक्त ठरणार आहे. यामुळे सुमारे तासभराचा प्रवास जेमतेम २० ते २५ मिनिटांत पूर्ण होईल, असे सांगण्यात येते.