उन्हाच्या तडाख्यातून सुटणार; ठाण्यासह कोकणात पाऊसधारा

मुंबई: एप्रिलपाठोपाठ मे महिन्याच्या सुरूवातीलाही उष्णतेच्या लाटेने सगळ्यांचा घाम काढला. पण, पुढील काही दिवसांत अंगाची लाहीलाही करणाऱ्या उकाड्यातून सुटका होऊ शकते. हवामान विभागाने राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात वेगवान वारे, विजांच्या कडकडाटासह पाऊस होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

सोमवारी म्हणजे ४ मे रोजी विदर्भात काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, नागपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांत मध्यम पाऊस होण्याचा अंदाज असून, यलो अलर्ट देण्यात आला आहे.

यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा अंदाज असून, हवामान विभागाने या चार जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्टही जारी केला आहे. ५ मे रोजीही विदर्भात पाऊस होण्याचा अंदाज आहे. विदर्भातील सर्वच जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट दिला गेला आहे.

बुधवारी (६ मे) पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज आहे. काही जिल्ह्यात खबरदारी घेण्याचा इशारा दिला गेला आहे. त्याचबरोबर ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसह मराठवाड्यातील धाराशिव, लातूर या जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

७ मे रोजीही पश्चिम विदर्भातील जिल्हे, मराठवाड्यातील बीड, धाराशिव आणि लातूर; तसेच पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट दिला गेला आहे.