बदलापूर: महावितरण खात्याच्या अनागोंदी कारभाराविरोधात तसेच टीओडी मीटर लावण्याच्या धोरणाविरोधात महाविकास आघाडीच्या माध्यमातून महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस अविनाश देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बदलापूर शहरातील पश्चिमेकडील महावितरण कार्यालावर मोर्चा काढून टीओडी मीटरच्या माध्यमातून होत असलेल्या नागरिकांवरील वाढीव बिलाचा भार, ठेकेदारांच्या मार्फत बसवण्यात येत असलेले टीओडी मीटर बाबतीत असंतोष व्यक्त करण्यात आला. महावितरणचे अधिकारी कार्यालयामध्ये अनुपस्थित असल्यामुळे महावितरणचे मुख्य अभियंता वाघमोडे यांचा केबिनमधील खुर्चीला मागण्यांचे निवेदन लावण्यात आले. महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना निवेदन देऊन यापुढे शहरातील ग्राहकांच्या परवानगीशिवाय जर टीओडी मीटर लावले तर अधिकाऱ्यांसहित संबंधित कंत्राटदारावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस देशमुख यांनी अधिकाऱ्यांच्या समक्ष कर्मचाऱ्यांना देण्यात आला. तसेच यापुढे ग्राहकांना वाढीव बिल दिलेत तर ते बिल तीन महिन्यांच्या बिलाचा अभ्यास करून कमी करण्यात येतील, अशी ग्वाही महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती सरचिटणीस देशमुख आणि इतर पदाधिकाऱ्यांना देण्यात आली.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख किशोर पाटील महिला आघाडीच्या तांबे, नागेश बारे, हेमंत पाटील, प्रकाश घाडीगावकर, आदिती बारे, दक्षता तांबे, स्वप्नील शिर्के, प्रणाली बालमवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.