दुर्घटनाग्रस्तांना नुकसान भरपाई, नोकरी आणि चौकशी – डावखरे

ठाणे: गावदेवी भाजी मंडईत लागलेल्या आगीत प्राणांची बाजी लावून कर्तव्य बजावताना शहीद झालेले अग्निशमन अधिकारी सागर शिंदे आणि सुरक्षा रक्षक काळू गाडेकर यांना आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

“स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचे बलिदान कधीही विसरता येणार नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी असून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

अनेक गाळाधारकांचे अंदाजे ५ ते १० लाख रुपयांपर्यंत नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, प्रशासनाने तातडीने पंचनामे करून बाधित व्यापारी, नागरिक आणि कुटुंबांना योग्य व कमाल नुकसानभरपाई जाहीर करावी, अशी मागणी डावखरे यांनी केली. या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचा मुख्य आधार हरपला असून त्यांच्या कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी वारसा हक्कावर (अनुकंपा तत्त्वावर) तत्काळ शासकीय अथवा संबंधित सेवेत नोकरी देण्यात यावी, अशी मागणीही डावखरे यांनी प्रशासनाकडे केली. संबंधित कुटुंबातील पात्र सदस्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार योग्य पदावर समाविष्ट करून घ्यावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी या घटनेमागील संभाव्य निष्काळजीपणाकडेही गंभीरपणे लक्ष वेधले. गावदेवी भाजी मंडई ही केवळ भाजी विक्रीसाठी उभारण्यात आली होती. मात्र, स्थावर मालमत्ता विभागाच्या ढिसाळ आणि संशयास्पद कारभारामुळे परिसरात अनधिकृत टपऱ्या आणि अतिरिक्त बांधकामे वाढल्याचे त्यांनी नमूद केले. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली नाही, असा आरोप त्यांनी केला. आजची दुर्घटना ही प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा आणि भ्रष्ट कारभाराचा परिणाम आहे. योग्य वेळी कारवाई झाली असती, तर कदाचित ही दुर्घटना टाळता आली असती. या निष्काळजीपणाची किंमत दोन निष्पाप कर्मचाऱ्यांना जीव गमावून चुकवावी लागली, हे अत्यंत वेदनादायी आहे,” असे डावखरे यांनी स्पष्टपणे नमूद केले.

या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, आग प्रतिबंधक यंत्रणांचा सखोल आढावा घ्यावा तसेच भविष्यात अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी शहरातील व परिसरातील सर्व बाजारपेठांचे तत्काळ ‘फायर ऑडिट’ करण्यात यावे, अशी मागणीही त्यांनी केली. ज्या ठिकाणी अग्निसुरक्षेतील त्रुटी आढळतील, तेथे तातडीने कठोर उपाययोजना करून अग्निशमन यंत्रणा सक्षम व सज्ज करण्यात यावी, असेही आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी प्रशासनाला सुचवले.