शासनाच्या खारभूमी मैदानाचा व्यावसायिक वापर

राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आव्हाडांवर आरोप

ठाणे : कळव्यातील खारभूमी मैदानावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये चांगलीच जुंपली असून शासनाच्या या मैदानाचा व्यावसायिक वापर होत असल्याचा पलटवार राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे आणि माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी माजी मंत्री तथा शरद पवार गटाचे नेते डॉ.जितेंद्र आव्हाड यांच्यावर केला आहे.

कळव्यातील खारभूमी येथील मैदान जिल्हाधिकाऱ्यांकडून बंद करण्यात आल्याने माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हे मैदान अजित पवार यांच्याच आदेशाने बंद करण्यात आले असल्याचा आरोप केला होता. याशिवाय या राजकारणात मुलांचे नुकसान होत असल्याचा आरोपही आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. बुधवारी राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपे आणि माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यास प्रत्युत्तर दिले आहे. औरंगजेबाला जसे संताजी, धनाजी दिसायचे, तसेच आव्हाडांना स्वप्नात अजित पवार दिसत असल्याचे परांजपे म्हणाले. हे मैदान शासनाच्या मालकीचे असून आव्हाडांनी मात्र आपली जहागीर असल्यासारखे या मैदानाचा वापर केला आहे. मैदानाचे रीतसर भाडे भरूनही आव्हाडांच्या गुंडांकडून मला अडवण्यात आले होते असे परांजपे यांनी सांगितले. कोणत्याही संस्थेला कार्यक्रम करू देत नव्हते. या मैदानाला टाळे ठोकण्याची कारवाई ज्या अधिकाऱ्याने केली आहे त्यांना देखील मारहाण होऊ नये यासाठी त्यांना पोलीस बंदोबस्त देण्यात यावा, अशी मागणीही परांजपे यांनी केली.

सह्याद्री येथील त्यांचे कार्यालय देखील अनधिकृत असून या ठिकाणी ठाणे महापालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता ७५ लाख रुपये खर्च करून लायब्ररी बांधण्यात आली असल्याचा आरोपही परांजपे यांनी केला. मुख्यमंत्र्यांवर टीका करायची आणि निधीसाठी त्यांच्याकडेच जायचे, त्यामुळे आव्हाडांसारखा कपटी मित्र असण्यापेक्षा दिलदार शत्रू असलेला बरा असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांनी देखील आव्हाडांवर टीका केली असून लहान मुलांचा वापर करून राजकारण करणे योग्य नसल्याचे मुल्ला म्हणाले. सरकारी जागेवरील टर्फ कोणाचे? स्टेशनला असलेले बेकायदेशीर पार्किंग, या पार्किंगचे पैसे कोण घेतो आणि हप्ते कोण घेतो, त्यावर कारवाईची मागणी केली असून हे पार्किंग मोफत देण्याची मागणी आपण केली असल्याचे मुल्ला यांनी सांगितले. 72 एकरवर चाळी बांधणारे कोण आहेत हे देखील लवकरच समोर आणणार असल्याचे मुल्ला यांनी सांगितले.