स्थानिक पातळीवर कुरघोडी करणे अयोग्य
ठाणे : ठाणे आणि कल्याण लोकसभेच्या मुद्यावरुन स्थानिक पातळीवर सध्या भाजप आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दीक चकमक सुरु आहे. त्यात आता शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे.
२०१९ ला लोकसभा निवडणुकीत कल्याण आणि ठाणे या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते. तेव्हा सेना-भाजप युतीचे मिळून ४२ खासदार राज्यातून लोकसभेत गेले होते. त्यामुळे यावर भाष्य करणे उचीत होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावर दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. त्यावर स्थानिक पातळीवर कोणीही कुरघोडी करणे अयोग्य असल्याचे मत सरनाईक यांनी व्यक्त केले. तर मंत्रीमंडळ विस्तारबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे.ज
राज्यात सध्या असलेले २० मंत्री हे उत्तम काम करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तर तुमचा मंत्रीमंडळात समावेश होईल का? असा प्रश्न विचारला असता त्यावर सरनाईक यांनी थेट बोलणे टाळले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर मी मागील तीस वर्षांपासून काम करत आहेत. ते दिलेला शब्द पाळणारे व्यक्तिमत्व आहे. परिणामी ते दिलेला शब्द पाळतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
ठाणे शहरातील नाले सफाई, रस्त्यांची सुरु असलेली कामे आदी प्रश्नाबाबत आमदार सरनाईक यांनी आयुक्त अभिजित बांगर यांची ठाणे महापालिका मुख्यालयात भेट घेतली. यावेळी सध्या शहरात ५० टक्के नालेसफाई झाली असल्याचे आयुक्ताच्या निदर्शनास आणून दिले. उरलेली नालेसफाई त्वरित करण्यात यावी, ही मागणीही आयुक्ताकडे केली. त्याचप्रमाणे शहरातील रस्त्यांची कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याची मुदत आयुक्तानी दिली होती. पण आजही रस्त्यांची कामे सुरु आहेत. ती लवकर पूर्ण करावी ज्याने नागरिकांना वाहतूक त्रास होणार नसल्याचे त्यांनी सांगितले. त्याच जोडीला ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्रातील विविध विकासकामाबाबत ही सरनाईक यांनी आयुक्ताशी यावेळी चर्चा केली.
शिवसेना असेल किंवा भाजपचे असतील त्यानुसार जेष्ठ नेते जेव्हा निर्णय घेतात, तेव्हा आमच्यासारख्या गल्लीतील नेत्यांनी आपल्या मर्यादा ओळखायला हव्या आणि त्या मर्यादा सांभाळून आपल्याला बोलायला हवे असे मत शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी व्यक्त केले.