दिवसातून दोनदा होणार साफसफाई; २३ ठेकेदारांना नवीन नियमावली

ठाणे: मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या उपक्रमांतर्गत शहरात स्वच्छतेचे १ सप्टेंबरपासून नवीन पर्व सुरू होत आहे. वार्षिक ४५ कोटी खर्च करून शहर स्वच्छतेचे अभियान राबवण्यात येणार आहे. त्यासाठी २३ ठेकेदारांना नवीन नियमावली आखून देण्यात आली असून ‘दर्जा’ ही अट बंधनकारक करण्यात आली आहे.

यापुढे केवळ एका सत्रात नव्हे तर दोन सत्रामध्ये शहराची साफसफाई होणार आहे. सकाळी साडेआठ वाजेपर्यंत मुख्य रस्ते चकाचक झाल्यानंतरही दुपारी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत अंतर्गत रस्त्यांची सफाई करण्यात येणार आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रात साफसफाईसाठी महापालिकेच्या सेवेतील सफाई कर्मचारी आणि कंत्राटदारांकडून नेमलेले सफाई कर्मचारी कार्यरत असतात. १ सप्टेंबरपासून कंत्राटी सफाई कंत्राटदारांच्या नवीन कंत्राट कालावधीस सुरूवात होणार आहे.  त्याअनुषंगाने महापालिका क्षेत्रात एकूण २३ गट सफाईसाठी कार्यरत राहणार असून साफसफाईवर वार्षिक खर्च सुमारे ४५ कोटी रुपयांच्या घरात पोहचणार आहे. त्यामुळे खर्च झालेला निधी ‘कचर्‍यात’ जाऊ नये यासाठी स्वच्छतेचा दर्जा चांगला असावा यासाठी संबंधित कंत्राटांमध्ये अटी शर्तीत सुधारणा करण्यात आल्या आहेत. वेळेचे काटेकोर पालन, गणवेशामध्ये बदल आणि अत्याधुनिक साधनांचा अंतर्भाव यामध्ये करण्यात आला आहे.

ठाणे पालिका क्षेत्रामध्ये सकाळी रस्त्यांची साफसफाई केली जात होती. ही साफसफाई ठाणेकर घराबाहेर पडण्याआधी होण्यासाठी पालिका आयुक्त अभिजित बांगर आग्रही होते. त्यानुसार सकाळी सहा वाजता रस्ते सफाईचे काम सुरू करून ती  सकाळी ८.३० वाजेपर्यंत पूर्ण करण्याची अट ठेकेदारांना घालण्यात आली आहे. यामध्ये महापालिका क्षेत्रातील सर्व मुख्य रस्त्यांची सफाई केली पूर्ण जाणे अपेक्षित आहे. त्यानंतर अंतर्गत रस्ते साफ केले जातील. हे वेळापत्रक काटेकोरपणे पाळले जावे असे निर्देश आयुक्त बांगर यांनी दिले आहेत.

पहिल्या दिवसापासून ही कालमर्यादा पाळली जावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्याचबरोबर, दुपारी चार ते रात्री १२ या वेळेत दुसर्‍या टप्प्यातील सफाई केली जाणार आहे. आतापर्यंत एका गटामार्फत रात्र पाळीतील सफाई होत होती. त्यात आणखी एका गटाची भर घालण्यात आली आहे.

कंत्राटी सफाई कर्मचार्‍याना यापुढे वेगळे गणवेश दिले जातील. त्यातही सकाळी काम करणार्‍यांचा गणवेश रंग वेगळा असेल. तर, संध्याकाळी काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा गणवेश वेगळा राहील.

महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी पूर्वीप्रमाणेच खाकी गणवेश परिधान करतील. कंत्राटी कर्मचारी यांची भविष्य निर्वाह निधी आणि राज्य कामगार विमा आयोग यांची प्रदाने संबंधित प्राधिकरणाकडे भरल्याशिवाय कंत्राटदारांची मासिक देयके अदा केली जाणार नाहीत, असे स्पष्ट निर्देश आयुक्त  बांगर यांनी दिले आहेत.

कर्मचार्‍यांच्या हाती नवीन त्रिकोणी झाडू

आतापर्यंत लांब झाडूने सफाई करण्याची पद्धत होती. यापुढे सर्व सफाई कर्मचार्‍यांना कडक काड्या असलेले त्रिकोणी झाडू देण्यात येणार आहेत. या झाडूमुळे अधिक चांगली सफाई करता येईल. रस्त्यावर चिकटलेला कचरा, ओली माती काढणे, कोपरे साफ करणे या झाडूमुळे शक्य होणार आहे.

महापालिका क्षेत्रात सफाईच्या कामासाठी एकूण २३  गट कार्यरत आहेत. त्यात आता ओवळा भागासाठी स्वतंत्र गट तयार करण्यात आला आहे. त्यामुळे वाढत्या ठाण्यातील साफसफाईच्या कामाला त्यामुळे स्वतंत्र मनुष्यबळ मिळणार आहे. रस्ते झाडून जमा झालेला कचरा वाहून नेण्यासाठी आतापर्यंत पत्र्याची गाडी वापरली जात असे. यापुढे टप्प्याटप्याने सगळीकडे १२० किंवा २४० लिटरचे डबे दिले जाणार आहेत. सध्या दोन गाड्यांद्वारे यांत्रिकी पद्धतीने सफाई केली जात आहे. त्यात लवकरच आणखी चार गाड्यांची भर पडणार आहे. एकूण सहा गाड्यांद्वारे प्रमुख रस्त्यांची यांत्रिकी पद्धतीने सफाई करून त्या रस्त्यांवरील मोकळे झालेले मनुष्यबळ अंतर्गत रस्त्यांवर वळवण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त  बांगर यांनी दिली.