ठाण्यात प्रशासनाचा उरला नाही धाक
ठाणे : ठाणे महापालिका प्रशासनाने गेल्यावर्षी जाहीर केलेल्या यादीतील ८१ पैकी २३ अनधिकृत शाळा कायमस्वरूपी बंद झाल्या असल्या तरी ५८ अनधिकृत शाळा आजही सुरू असल्याचे प्रशासनाच्या नव्या यादीतून उघड झाले आहे. विशेष म्हणजे ५८ पैकी ३७ शाळांवर गुन्हे दाखल असूनही या अनधिकृत’ शाळांचा कारभार बिनधास्तपणे सुरू असल्याचे चित्र आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात गेल्या वर्षी अनधिकृत शाळांची संख्या ८१ होती. त्यापैकी काही शाळांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. एवढेच नव्हे तर, या शाळांच्या बांधकामांवर अतिक्रमण विभागामार्फत कारवाई प्रस्तावित केली होती. ३२ शाळांची पाणी जोडणीही खंडित करण्यात आली होती. तसेच, संबंधित संस्थांवर तब्बल ५२ कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता, असा दावा प्रशासनाने त्यावेळी केला होता. असे असले तरी अनधिकृत शाळांचा कारभार थांबलेला नसल्याचे चित्र पुढे आले आहे.
ठाणे महानगरपालिकेने यंदा ५८ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली असून त्यापैकी ३७ शाळांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. तरीही या शाळा आजही सर्रासपणे सुरू असल्याचे समोर आले आहे. यानिमित्ताने ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत शाळांविरोधातील कारवाई केवळ कागदापुरतीच मर्यादित राहिल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
ठाणे महानगरपालिकेने यंदा ५८ अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली असून त्यात ५३ शाळा इंग्रजी माध्यमाच्या असून, हिंदी माध्यमाच्या तीन आणि मराठी माध्यमाच्या दोन शाळांचाही समावेश आहे. विशेषतः एकट्या दिव्यातच ३८ शाळा असल्याचे समोर आले आहे. याशिवाय कळवा परिसरात ९, उथळसरमध्ये २, माजिवडा-मानपाडा भागात २ तर मुंब्रा आणि इतर भागात ७ शाळा अनधिकृत आहेत.
पालकांनी कोणत्याही परिस्थितीत या ५८ शाळांमध्ये प्रवेश घेऊ नये. अनधिकृत शाळांविरोधात दंडात्मक आणि कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे, असे उपायुक्त (शिक्षण) डॉ. मिताली संचेती यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, गुन्हे दाखल होऊनही शाळा सुरू राहत असतील, तर प्रशासनाचा धाक नेमका कुठे आहे? असा सवाल आता पालक आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.