डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केला घोड्यावरून प्रवास
ठाणे: पंतप्रधान मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर कमी करावा असे आवाहन केले आहे. त्याची अमलबजावणी सर्वात आधी ठाण्याचे महापौर आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी करावी, अशी मागणी करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चेकऱ्यांनी महापौर शर्मिला पिंपलोळकर यांना निवेदन देऊन, खासगी गाड्यांचा वापर न करता टीएमटीच्या बसगाड्यांचा वापर करावा, असे आवाहन केले.
दोन दिवसांपूर्वीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेशी चलन वाचविण्याचे आवाहन भारतीयांना केले आहे. हे चलन वाचविण्यासाठी त्यांनी काही उपाय सूचविले आहेत. अर्थात, हे उपाय म्हणजे “भीक नको, कुत्रं आवर” अशा पद्धतीचे आहेत, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाने गणेशवाडी ते ठाणे महानगरपालिका मुख्यालय अशी रॅली काढली. या रॅलीत डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी चक्क घोड्यावर बसून महानगर पालिकेपर्यंत प्रवास केला. तर, जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, महिला अध्यक्ष मनीषा भगत, युवक अध्यक्ष अभिजित पवार, युवक कार्याध्यक्ष राजेश कदम यांनी बैलगाडीतून पालिका मुख्यालय गाठले.
यावेळी डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. बंगालच्या निवडणुका संपल्या आहेत. आता पेट्रोल तीस रुपयांनी महाग करायला हे सरकार मागे पुढे पाहणार नाहीत. हे सरकार आणि त्यांचे पाठीराखे मुस्लिम द्वेष निर्माण करीत आहेत. त्यांच्यात जर हिंमत असेल तर पेट्रोल-डिझेलवर बहिष्कार घाला. बैलगाडीतून, घोड्यावरून फिरा. पण, ते देखील गोरगरीब लोकांना परवडणार आहे का?, असा सवालही डाॅ.जितेंद्र आव्हाड यांनी केला.
या आंदोलनात जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, गटनेता अभिजीत पवार, महिला अध्यक्ष नगरसेविका मनिषा भगत, नगरसेविका पल्लवी जगताप, दीपाली भगत, मर्जिया पठाण, महिला कार्याध्यक्षा फुलाबानो पटेल, जिल्हा युवक कार्याध्यक्ष राजेश कदम, प्रशासन सरचिटणीस राजेश साटम, शमीम खान, कैलास हावळे, आशिष उमासरे, मिलिंद बनकर, सचिन पंधरे, माधुरी सोनार, मकसूद खान, शिवा कालू सिंह, जगत सिंह परोचा, बालेश हत्तिंबिरे, सचिन भातबरे, राकेश भगत, धर्मेंद्र अस्थाना, जैद खानचे, सोनाली कदम, दिपाली गावंड , सपना पाटील, आदी सहभागी झाले होते.