आमदार संजय केळकर यांनी उदघाटन कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा दिला इशारा
ठाणे : निवडणूक काळात भाजप शिवसेनेचा घोष आणि आता विकासकामांच्या उदघाटनाला फक्त शिवसेना, अशी भूमिका सत्ताधारी शिवसेनेची असून यापूढे रीतसर वेळेत निमंत्रण मिळाले नाही, भूमिकेत योग्य बदल झाला नाही तर भाजप अशा कार्यक्रमांवर बहिष्कार टाकेल, असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिला.
नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध उपक्रमांचे लोकार्पण, उदघाटन आणि भूमिपूजन झाले. या कार्यक्रमात सत्ताधारी पक्षातील सहकारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण नसल्याने उपमहापौरांसह दोन्ही आमदार आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.
याबाबत बोलताना आमदार संजय केळकर यांनी शिवसेनेच्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला. शिवसेनेचे हे धोरण नवीन नाही. निमंत्रण पत्रिकेत नाव टाकायचे पण सहकारी पक्षातील मान्यवर कसे येणार नाहीत, याची पुरेपूर काळजी घेतली जाते, अशी तिखट टीका श्री.केळकर यांनी केली. ठाणे महापालिकेतील उपमहापौरांसह भाजपच्या आमदारांनाही उचित निमंत्रण दिले नाही. हा भाजपचा अवमान आहे. उदघाटन कार्यक्रमांना काही आचारसंहिता आहे की नाही, आम्ही सुद्धा या कार्यक्रमांचे पुन्हा उदघाटन करायचे का? असा प्रश्न विचारत यात ठामपा प्रशासनाचा देखील दोष असल्याचा आरोप श्री.केळकर यांनी केला.
नवी मुंबईत विश्वासात घेतले जात नाही म्हणून शिवसेना छाती बडवते, पण ठाण्यात शिवसेना युती असताना एकट्यानेच श्रेय लाटत आहे. अशा कार्यक्रमात प्रोटोकॉल पाळला जायला हवा. याबाबत पालकमंत्र्यांनी देखील लक्ष घालून वेळीच दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन श्री.केळकर यांनी केले.