बेकायदेशीर बॅनरबाजीमुळे भिवंडी महापालिकेचा लाखोंचा महसूल बुडाला

भिवंडी: कोट्यवधी रुपये खर्च करून शहराचे केलेले सुशोभीकरण अवैध बॅनरबाजीमुळे अक्षरशः विद्रूप झाले असून त्यामुळे पर्यावरणालाही मोठा धोका निर्माण झाला आहे. रस्ते, चौक, डिव्हायडर आणि झाडांवर लागलेल्या असंख्य फ्लेक्स बॅनर्समुळे भिवंडीकर नागरिकांमध्ये संताप उसळला आहे. या पार्श्वभूमीवर पर्यावरणप्रेमी नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने हस्तक्षेप करून पालिका आयुक्तांना संबंधितांवर कारवाईचे आदेश देण्याची मागणी केली आहे.

भिवंडीत दर आठवड्याला वाढदिवस, जयंती, स्वागत, अभिनंदन या नावाखाली बेकायदेशीर बॅनरबाजीचा सुळसुळाट सुरु असतो. महापालिका संबंधितांवर कोणतीही कारवाई न करता आपल्या कर्मचाऱ्यांकडून बॅनर काढून या बेकायदेशीर बॅनरबाजी करणाऱ्या लोकांना प्रोत्साहन देते. गणेशोत्सव आणि ईद -ए-मिलाद निमित्ताने गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात बॅनरबाजी करण्यात आली. या दरम्यान प्रभाग अधिकाऱ्यांशी आणि परवाना विभागाशी साटेलोटे करून शहरातील आणि शहराबाहेरील व्यावसायिकांनी देखील आपले व्यवसायांचे बॅनर लावले होते. त्यांच्यावर देखील संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई केली नाही. महापालिकेचे प्रभाग अधिकारी त्यांच्या प्रभागात बॅनर काढण्याची कारवाई करीत असले तरी त्या ठिकाणी काही तासांत पुन्हा नवे बॅनर्स लावले जातात. जोपर्यंत बेकायदेशीर बॅनर लावणाऱ्या लोकांवर दंडनीय कारवाई होत नाही तो पर्यंत प्रसिद्धीस आसुसलेल्या लोकांना चाप बसणार नाही. विशेषतः राजकीय नेत्यांच्या वाढदिवसांच्या काळात आठ-दहा दिवस शहर मोठ्या बॅनर्सनी झाकले जाते. त्याकडे महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा संशय भिवंडीकरांमध्ये व्यक्त होत आहे.