कृत्रिम तलाव बनले डास निर्मितीची केंद्रे

ठाणे: गणेशोत्सवाच्या निमित्ताने महापालिकेने शहरभर कृत्रिम तलाव व कंटेनर उभारले. मात्र आता यात पाणी साचून डास निर्मिती मोठ्या प्रमाणात होऊ लागल्याने ठाणेकरांच्या आरोग्याचा प्रश्न उभा राहिला आहे.

मूर्ती नदी, तलाव, खाडीत विसर्जित होऊन नैसर्गिक जलस्त्रोतांचा नाश होऊ नये म्हणून कृत्रिम तलाव आणि कंटेनरची व्यवस्था गणेशोत्सव काळात करण्यात आली होती. या योजनेमागचा ठाणे महापालिकेचा उद्देश आदर्शवादी असला तरी हीच व्यवस्था आता ठाणेकरांची डोकेदुखी ठरू लागली आहे.

गणेशोत्सवानंतर कृत्रिम तलाव आणि कंटेनरमधील मूर्तीची माती काढण्यात आली. प्लास्टिक कापडही काढण्यात आले, मात्र येथे पाणी तसेच साचून राहिल्याने ते खराब होऊन दुर्गंधीयुक्त झाले. परिणामी डासांची निर्मिती होऊन परिसरातील रहिवाशांच्या आरोग्याची समस्या उभी राहिली आहे. आधीच डेंग्यू-मलेरियाने त्रस्त असलेले नागरिक आता आणखी भयभीत झाले आहेत.

लाखो रुपये खर्च करून कृत्रिम तलाव आणि कंटेनरची व्यवस्था निर्माण करण्यात आली, पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे डासनिर्मिती होऊन ठाणेकरांना दवाखान्याची वाट धरावी लागत आहे. एकूणच ही कृत्रिम व्यवस्था पैशांचा अपव्यव करणारी ठरली आहे.

प्रशासनाने हे कृत्रिम तलाव आणि कंटेनर तातडीने रिकामे करावेत, त्यांचे निर्जंतुकीकरण करावे आणि डेंग्यू-मलेरियावर नियंत्रणासाठी विशेष पथके तैनात करण्याची मागणी पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत सिनकर यांनी केली आहे. कररुपी पैशातून उभारलेले हे तलाव जर आज ठाणेकरांसाठी आरोग्याचा सापळा ठरत असतील, तर जबाबदार कोण? हा पर्यावरणपूरक उपक्रम की बेफिकीर प्रशासन?, असा प्रश्न सिनकर यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात उपस्थित करत ठाणे महापालिकेला तत्काळ निर्देश देण्याची मागणी त्यांनी केली आहे.