पोलिसावर हल्ला करणाऱ्या आरोपीला सीएसटी स्थानकातून अटक

भाईंदर: सायकल चोरीच्या आरोपावरून अटक केलेल्या आरोपीने पोलीसांवर जीवघेणा हल्ला करून पळून गेला. मात्र अवघ्या १२ तासात मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलिसांनी त्याला सीएसटी रेल्वे स्थानकातून ताब्यात घेतले आहे.

आयुक्तालयातील गुन्हे शाखा यांची सात पथके आणि मिरारोड, नया नगर व काशीमिरा पोलोसांची तीन पोलिसांची पथके अशी एकूण १० पथके आणि १०० पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी आरोपीचा शोध घेतला. पश्चिम बंगाल येथे पळून जाण्याचा तयारीत असतानाच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर (सीएसटी) आरोपी हैफूल अली कालूला ताब्यात घेत अटक केली आहे.

रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी हैफुलअली कालूअली शेख याला मोबाईल चोरी आणि सायकल चोरीच्या गुन्ह्यात अटक केली होती. मध्यरात्रीच्या सुमारास कर्तव्यावर असलेले दोन पोलीस कर्मचारी होते. त्यातील एक जण जेवण आणण्यासाठी गेला होता. जयकुमार राठोड हे मोबाईलमध्ये व्यस्त झाले असता आरोपीने खुर्चीच्या खालील लोखंडी रॉड काढत त्याने राठोड यांच्या डोक्यात जीवघेणा हल्ला केला.

जबर मार असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहे. हल्लेखोर फरार आरोपी विरोधात पोलिसांनी मिरारोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.