प्रताप सरनाईक फाउंडेशनतर्फे चैत्र नवरात्रौत्सवास प्रारंभ
भाईंदर: आश्विन नवरात्रीप्रमाणेच चैत्र नवरात्रीचा उत्साह देखील आता मीरा-भाईंदर शहरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. प्रताप सरनाईक फाउंडेशन आयोजित ‘दिव्य चैत्र नवरात्र उत्सव २०२६’ चा दिमाखदार प्रारंभ झाला असून, संपूर्ण शहर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले आहे.
१९ ते २८ मार्च या दरम्यान हा उत्सव मीरा रोड येथी नामदार गोखले मैदान वर मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. नवरात्रीच्या पहिल्या माळेला महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सहकुटुंब आदिमाया शक्तीची विधिवत स्थापना केली
गेल्या चार वर्षांपासून हा उत्सव आपल्या भव्यतेसाठी ओळखला जातो. यंदा या उत्सवाचे पाचवे वर्ष असून, दरवर्षीप्रमाणे एक आगळीवेगळी संकल्पना राबवण्यात आली आहे. यावर्षी भक्तांना प्रत्यक्ष दक्षिणेतील मंदिरांचा अनुभव घेता यावा, यासाठी दक्षिणात्य स्थापत्यशैलीचा भव्य देखावा साकारण्यात आला आहे. नक्षीकाम केलेले स्तंभ आणि भव्य गोपूर हे भाविकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहेत.
हिंदू तिथीनुसार चैत्र शुक्ल प्रतिपदेपासून सुरू होणाऱ्या या उत्सवात पुढील नऊ दिवस देवीच्या विविध रूपांचे पूजन केले जाणार आहे. ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धीदात्री अशा नऊ शक्तींचे पूजन, भजन आणि विशेष अनुष्ठान या काळात पार पडणार आहे. या नऊ दिवसांत वेगवेगळ्या समाजाचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहेत.