मोठागाव जेट्टीचे ७० टक्के काम पूर्ण

महापौर हर्षाली चौधरी यांनी केली जेट्टी आणि घाटाची पाहणी

कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिका महापौर हर्षाली चौधरी यांनी डोंबिवली पश्चिमेकडील मोठागाव आणि देवीचा पाडा परिसरात खाडीकिनारी जलवाहतूक व रो-रो बोट प्रकल्पासाठी जेट्टीच्या कामाची आणि गणेश उत्सवापूर्वी गणेश घाटाची तयारी यांचा पाहणी दौरा करण्यात आला.

जेट्टीचे सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले असून, यामुळे डोंबिवलीकरांना ठाणे, नवी मुंबई आणि वसईसाठी नवीन जलमार्ग मिळणार आहेत. तसेच गणेश उत्सवा पूर्वी शहरातील सर्व रस्ते खड्डे मुक्त आणि गणेशघाट स्वच्छ करण्यात येतील असे महापौर हर्षाली चौधरी यांनी सांगितले.

डोंबिवलीकरांसाठी वॉटर ट्रान्सपोर्ट ही भविष्यातील महत्त्वाची वाहतूक व्यवस्था ठरणार आहे. मोठागाव जेटीचे काम पूर्ण झाल्यानंतर डोंबिवली परिसरातून जलवाहतूक सुरू होण्याचा मार्ग अधिक सुकर होणार असून, नागरिकांना वाहतूक कोंडीला पर्यायी जलद आणि सुलभ प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. डोंबिवली शहरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता वॉटर ट्रान्सपोर्टमुळे नागरिकांच्या प्रवासाचा वेळ वाचण्यास तसेच रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मोठी मदत होणार असल्याचा विश्वास महापौरांनी व्यक्त केला.

यावेळी गटनेते विश्वनाथ राणे, नगरसेवक दिपेश म्हात्रे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, उपआयुक्त योगेश गोडसे, अभियंता सांगळे, सहाय्यक आयुक्त अभिमान पवार आणि पदाधिकारी उपस्थित होते.