उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चाव्यांचे वितरण
ठाणे: हाजुरी येथील सवेरा लॉज परिसरातील नागरिकांची घरे सन २००१-०२ मध्ये रस्ता रुंदीकरणासाठी संपादित करण्यात आली होती. मात्र, त्यानंतर तब्बल २५ वर्षे या नागरिकांचे पुनर्वसन रखडले होते. अनेक सरकारे आली-गेली, आश्वासने मिळाली; परंतु प्रत्यक्षात घरांचा प्रश्न कायम प्रलंबितच राहिला होता.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार नगरसेवक विकास रेपाळे व नगरसेविका नम्रता भोसले-जाधव यांनी या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावा केला. संबंधित विभागांसोबत वेळोवेळी बैठका, प्रशासनाशी समन्वय आणि आवश्यक कार्यवाही करून अखेर या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा करण्यात यश आले.
या प्रयत्नांचे फलित म्हणून आयोजित करण्यात आलेल्या एका अनौपचारिक कार्यक्रमात श्री.शिंदे यांच्या हस्ते १९ लाभार्थी कुटुंबांना त्यांच्या हक्काच्या घरांच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर स्वतःच्या घराच्या चाव्या स्वीकारताना लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, समाधान आणि भावनांचा अनोखा संगम पाहायला मिळाला.
यावेळी उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले, “विकास प्रकल्पांमुळे कोणत्याही नागरिकावर अन्याय होणार नाही. प्रकल्पासाठी सहकार्य करणाऱ्या एकाही नागरिकाला बेघर होऊ देणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे. प्रत्येक पात्र नागरिकाला न्याय मिळवून देणे ही शासनाची जबाबदारी आहे.”
यावेळी लाभार्थ्यांनी भावना व्यक्त करताना सांगितले, “आम्ही हक्काचे घर मिळण्याची आशाच सोडून दिली होती. मात्र शिंदे साहेब यांच्या आशीर्वादामुळे आणि नगरसेवक विकास रेपाळे व नगरसेविका नम्रता भोसले-जाधव यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आज आमचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले.”
यावेळी विकास कृष्णा रेपाळे यांनी सांगितले की, “जनतेला न्याय मिळवून देणे आणि त्यांच्या जीवनाशी निगडित प्रश्न सोडविणे हीच आमची प्राथमिकता आहे. २५ वर्षे रखडलेला हा प्रश्न मार्गी लागणे हे जनतेच्या विश्वासाचे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याचे यश आहे. नागरिकांना त्यांच्या हक्काचे घर मिळवून देणे, यापेक्षा मोठे समाधान दुसरे असू शकत नाही.”
नगरसेविका सौ. नम्रता भोसले-जाधव यांनी सांगितले की, “ही केवळ घरांच्या चाव्यांचे वाटप करण्याची घटना नसून, २५ वर्षे न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांच्या आयुष्यातील नव्या पर्वाची सुरुवात आहे. नागरिकांच्या चेहऱ्यावरचे समाधान आणि आनंद हेच आमच्या जनसेवेचे खरे बळ आहे.”